अभाविपतर्फे राज्य सरकारविरोधात #SayNoToCovidDegree आंदोलन
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीही झाले तरीही परीक्षा घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या ठाकरे सरकारवर अभाविपने खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. इतर परीक्षा रद्द करायच्या पण एमपीएसीला बसलेल्या ३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना मात्र, परीक्षा घेण्यावर ठाम राहायचे हे कोणते राजकारण सरकार खेळत आहे, असा प्रश्न या माध्यमातून विचारण्यात आला आहे.
राज्यात एमपीएससीच्या परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास कोरोनाचे कारण दाखवले जात आहे. या पार्श्वभूमीवर अभाविपने आता सरकारला लक्ष्य केले आहे. याबद्दल राष्ट्रीय सचिव अनिकेत ओव्हाळ यांनी सरकारला धारेवर धरले आहे. "१९८३-८५ दरम्यान नागपूर विद्यापीठात मार्कशीट घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रमोटेड डिग्रीचा किती उपयोग त्या बॅचला झाला हे संपूर्ण देशाने पाहिले आहे.", असे म्हणत प्रमोडेट डीग्री विद्यार्थ्यांच्या माथी मारू नका, असे आवाहन अभाविपने केले आहे.
#SayNoToCovidDegree हे अभियान अभाविप मार्फत राबवले जात आहे. यावर अनेकांनी राज्य सरकारला लक्ष्य करत परीक्षांबद्दल जाब विचारला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनाही या प्रकरणी लक्ष्य करण्यात आले आहे. "भूमिका बदलू सरकार! आणि मंत्री महोदय सुद्धा! अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका अशी एका रात्रीतून ठरत नाही! बरेच लोक चर्चा करून सारासार विचार करून भूमिका ठरवतात. त्यामुळे अशी पलटी मारून भूमिका बदलण्याची वेळ येत नाही!", असा टोला देवश्री खरे या विद्यार्थीनीने मंत्री उदय सामंत यांना लगावला आहे. कोरोना संपून जाईल मात्र, कोरोना डीग्रीचा शिक्का आयुष्यभर माथ्यावर राहील, अशी भूमिका अभाविप माजी समिती सभासद साक्षी मुळये यांनी मांडली आहे.