नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह सोमवारी व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली. मोदींनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. गुगल भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले, "आज सकाळी सुंदर पिचाई यांच्याशी सकारात्मक विषयांवर चर्चा झाली. आम्ही भारताच्या शेतकरी, युवा आणि उद्यमींचे आयुष्य सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याच्यासह अन्य मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. गुगलतर्फे भारतात शिक्षण, डिजिटल इंडिया, डिजिटल पेमेंटसह अन्य क्षेत्रांमध्येही सुरू असलेल्या कामाबद्दल माहिती मिळाली."
मोदींनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, 'सुंदर पिचाई यांच्यासह झालेल्या चर्चेत नव्या कार्यसंस्कृतीचा तसेच कोरोनाच्या काळातील नव्या आव्हानांबद्दल विचारविमर्श केला. डेटा आणि सायबर सुरक्षा या मुद्द्यांवरही आमची चर्चा झाली.' परदेशी कंपन्यांना गुंतवणूकीची द्वारे खुली राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जागतिक सोहळ्यात सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्यासाठी दारे कायम खुली राहणार आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारत कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी सक्षम आहे. आत्मनिर्भर भारत ही योजनाही देशातील उद्योगांना स्वावलंबी बनण्यासाठी आहेत. याचा अर्थ विदेशी कंपन्यांचा व्यापार बंद करणे, असे होत नाही.
गुगल करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक
गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये सुंदर पिचाई यांनी भारतातील डिजिटलायझेशनची घोषणा केली होती. या दरम्यान अनेक घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. पुढील पाच ते सात वर्षात भारत ७५ हजार कोंटींची म्हणजेच १० अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक इक्विटी इनवेस्टमेंट, भागिदारी, ऑपरेशनल इन्फ्रास्टक्चर या माध्यमांतून केले जाणार आहे.