नवी दिल्ली : “राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला काँग्रेस नेते राहुल गांधीच जबाबदार आहेत.” असा आरोप भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, “मध्य प्रदेशामध्ये झालेल्या राजकीय परिस्थितीलाही तेच जबाबदार होते. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठे होऊ देत नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती. आता सचिन पायलट यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही.” अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसची सत्ता आली तेव्हा अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासूनच सचिन पायलट हे नाराज असल्याचे बोललं जात होते. आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्यासोबत १०२ आमदार आहेत हा जो दावा केलाय तो चुकीचा आहे, असे सचिन पायलट यांनी म्हटले होते. माझ्यासोबत २५ आमदार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे राजस्थानमध्ये अस्थिर स्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असे आता भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी म्हंटले आहे.