पुणे : शनिवारी शेखर गायकवाड यांची पुण्याच्या आयुक्त पदावरून तडका फडकी बदली करण्यात आली. त्यांच्याजागी विक्रम कुमार यांनी अवघ्या २४ तासांमध्ये पदभार स्वीकारला. मात्र, यावरून आता हे एक गलिच्छ राजकारण असल्याची टीका आता खुद्द कॉंग्रेस नेत्यानेच केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी गायकवाड यांची बदली ही राजकीय दबावातून झाली असल्याचा आरोप केला आहे.
कॉंग्रेस नेते संजय बालगुडे यांनी पत्रात लिहिले आहे की, “शेखर गायकवाड यांची बदली केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. शेखर गायकवाडांच्या बदलीमागे मराठी अधिकारी विरुद्ध हिंदी अधिकारी असा वाद आहे. काही सत्ताधाऱ्यांना महापालिका आयुक्त हे ताटाखालचे मांजर असावे, असे वाटते. शिवाय त्यांची बदली करताना पूर्वीच्याच पदावर करण्यात आली आहे. जर त्यांना पूर्वीच्याच पदावर नियुक्त करायचे होते, तर सहा महिन्यांनासाठीच पुणे महापालिकेत त्यांना का आणले होते?, असा प्रश्न् पुणेकरांना पडला आहे.” अशी टीका त्यांनी केली आहे.
“शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली झाली. मुळात त्यांची नेमणूक होऊन जेमतेम सात आठ महिने झाले. मार्चमध्ये कोरोना महामारी सुरु झाल्यापासून चार महिन्यात त्यांनी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशासक म्हणून अतिशय उत्तम काम केले. कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांनी एका सैनिकाप्रमाणे काम केले. या बरोबरच महापलिकेतील भ्रष्टाचाराही अनेक प्रकरणेही त्यांनी शोधून काढली. त्यातून पुणेकरांचे पैसे वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळे त्यांची बदली होणे म्हणजे गलिच्छ राजकारणाचे प्रतिक आहे.” असेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.