कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला २० आणि काँग्रेसला १० जागाच आल्या असत्या, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामनातील मुलाखतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाला हे सरकार ५ वर्षे टिकणार आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा असे म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या २० आणि काँग्रेसच्या १० जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण ९८ जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या १०५ निवडून आल्या आहेत.”