नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर उद्योगधंदे ठप्प झाल्यानंतर घरखर्चासाठी येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली प्रतिमहिना पाचशे रुपये योजना जूननंतरही कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन महिन्यांसाठी प्रत्येक जनधन खात्यात पाचशे रुपये थेट जमा करण्यात आले होते. जूननंतरही ही रक्कम प्रत्येक खात्यावर वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.
एका अहावालानुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ कायम सुरू राहवा यासाठी प्रयत्नशील आहेत. तर एका आकडेवारीनुसार, ५० टक्क्यांहून अधिक महिलांनी आपल्या खात्यातील रक्कम अद्याप काढलेली नाही. या योजनेद्वारे देशभरातील २० कोटी खातेधारकांना थेट लाभ मिळत आहे. लॉकडाऊनमुळे येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी थोडी का होईना परंतू मदत करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आला.
गेल्या आठवड्यात या योजनेचा अंतिम हप्ता केंद्रातर्फे देण्यात आला. अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मते, या योजनेसाठी ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना सुरू ठेवण्याबद्दल अंतिम निर्णय घेण्याबद्दल पंतप्रधान कार्यालयातर्फे निर्णय घेण्यात येणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी मिळाल्यास जागतिक पातळीवर घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांप्रमाणेच हे स्वरुप असेल.
दरम्यान, या योजनेअंतर्गत जमा केलेल्या अर्थसहाय्यापैकी ५० टक्के महिलांनी आपल्या खात्यातील रक्कम अद्याप वर्ग केलेली नाही. लॉकडाऊनमुळे बँकेबाहेर लागणाऱ्या लांबलचक रांगा, विस्थापित झालेली कुटूंबे, पीएमवाय खात्याचे डिजिटल लिंक जोडणी नसल्याने या अडचणी येत आहेत. या योजनेअंतर्गत सरकारने अद्याप २० हजार कोटी रक्कम जमा केली आहे.