मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे आकर्षण असलेला मुंबईचा गणेशोत्सव यंदा साधेपणानेच साजरा होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र गणेशोत्सव समन्वय समिती शासनाच्या राज्य शासनाच्या निर्देशांकडे डोळे लावून बसली आहे. राज्य शासनाकडून मात्र निर्णय देण्यास विलंब लागला जात आहे. मुंबईतच ४० हजारांच्या पुढे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर राज्यभरात हीच संख्या ७४ हजारांच्या पुढे आहे. मात्र बरे झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेले वगळले तर सध्या मुंबईत २४ हजारांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
राज्यभरात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४० हजारांपर्यंत आहे. मुंबईतला गणेशोत्सव हा मोठा गर्दीचा सण आहे. मोठमोठ्या गणेशमूर्तींचे आगमन धुमधडाक्यात होतेच, शिवाय विसर्जन मिरवणुकाही हजारोंच्या संख्येने निघतात. यावेळी गणेशमूर्ती विसर्जनस्थळी भाविकांचा महासागर उसळतो. दीड दिवस भाविकांकडून सेवा करून घेणाऱ्या गणेशमूर्तीपासून ११ दिवसा भाविकांना आनंद देणाऱ्या मूर्तींचा विसर्जन मिरवणूक सोहळा त्या अकरा दिवसात चालूच असतो. मात्र दर्शनापासून विसर्जन मिरवणूक सोहळ्यापर्यंत गर्दीत साजरा होणारा हा सण साजरा कसा करायचा, असा प्रश्न यंदा गणेशोत्सव मंडळांबरोबर गणेशोत्सव समन्वय समितीलाही पडला आहे.
राज्यभरात आजही कोरोनाची रुग्णसंख्या पाहता अंदाजे वर्षभर तरी कोरोना समाजातून हद्दपार होईल की नाही याबाबत शंका आहे. कोरोनावर औषध सापडले नसले तर सोशल डिस्टन्स पाळणे हाच एकमेव उपाय आहे. शिवाय मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर असे खबरदारीचे विविध उपाय आहेतच. मात्र सोशल डिस्टन्सिंगची समाजात वानवा आहे आणि गणेशोत्सवात सोशल डिस्टन्स पाळले जाईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळेच गणेशोत्सव साध्या पद्धतीत साजरा करावा अशी मानसिकता गणेशोत्सव मंडळांची झाली आहे.
शासनाच्या निर्देशाची प्रतीक्षा
गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, रमजान ईद असे सण आणि उत्सव साजरे झालेच. मात्र शासनाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे त्यांची पद्धत बदलली. त्यामुळे गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा याबाबत राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश द्यावेत. राज्यात काही निर्णय घेण्याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारांना परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार जी काही मार्गदर्शक तत्त्वे आखून देईल त्याप्रमाणे उत्सव साजरा करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ यंदाच्या वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळवली आहे. आता अधिक विलंब न लावता राज्य शासनाने आपली भूमिका जाहीर करावी, असे दहीबावकर म्हणाले.