पालिका आयुक्तांच्या आदेशाकडे रुग्णालये करतायत दुर्लक्ष
मुंबई : विरोधकांकडून कोरोना मृत्यू लपवत असल्याचा आरोप होऊन आणि तसे सिद्ध होऊनही खासगी रुग्णालयांकडून अद्यापही कोरोना मृत्यूचा अहवाल द्यायला दोन दिवसांहून अधिक काळ घेतला जात आहे. कोरोनामृत्यू अहवाल दोन ४८ तासांच्या आत देण्याचे आयुक्तांनी फर्मान सोडूनही खासगी रुग्णालयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यासारखेच दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाकडून कोरोनाचे मृत्यू लपवत असल्याचा आरोप झाल्यावर मुंबई महापालिकेला ८६२ मृत्यूंची नोंद करावी लागली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी ४८ तासात मृत्यूंची नोंद करावी असे आदेश दिले आहेत. त्यानंतरही १९ ते २७ जून या ९ दिवसात ४८ तासांपूर्वीच्या ४९० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पालिका आयुक्तांचे आदेश खासगी रुग्णालये जुमानत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईत १९ ते २७ जून या कालावधीत ४८ तासातील ४१४ तर ४८ तासांपूर्वीचे ४९० असे एकूण ९०४ मृत्यू झाले आहेत.
मुंबई महापालिका कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा लपवत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपानंतर राज्य सरकारच्या आदेशाने महापालिकेने ८६२ मृत्यूंची नोंद केली होती. मृत्यूंची नोंद रुग्णालयांकडून केली जात नसल्याने मृत्यूंची माहिती मुंबई महापालिकेकडे ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश पालिका आयुक्तांनी रुग्णालयांना दिले आहेत. मात्र पालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही रुग्णालयांनी गेल्या ९ दिवसात ४८ तासात मृत्यूंची नोंद केली नसल्याचे उघड झाले आहे. ४८ तासात मृत्यू नोंद करण्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिका आयुक्तांचे आदेश जुमानत नसल्याचे दिसत आहे.
रुग्णालयांवर कठोर कारवाई
रुग्णालये मुदतीत मृत्यूंची नोंद करत नसल्याने त्यांना २९ जून पर्यंत मृत्यूंची नोंद करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. वारंवार संधी देऊनही मृत्यूची माहिती न कळणाऱ्या रुग्णालयांवर यापुढे 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.