कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत मास्क लावल्याशिवाय फिरल्यास संबंधिताकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने मास्कसाठी कडक निर्णय घेतला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत दरदिवशी जवळपास बाराशे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मुंबईत दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच रुग्ण वाढू लागले आहेत.
रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करताना देखील प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे कोरोनाविरोधातील नियमांच्या विरुद्ध मानण्यात येणार आहे.