नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले. तर ४३ चीनी सैनिक मृत्युमुखी पडले. यानंतर भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून चीनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी देशभरातून होत आहे. याचदरम्यान, या संघर्षामध्ये जखमी झालेल्या सैनिकाच्या वडिलांचा एक व्हिडियो वायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधीजींनी याबद्दल राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे अमित शहा यांनीदेखील हा व्हिडियो रिट्विट केला आहे.
गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकाच्या वडिलांनी यामध्ये म्हंटले आहे की, “भारतीय लष्कर चीनविरुद्ध लढण्यात सक्षम आहे. ते चीनचा पराभव करू शकतात. राहुल गांधी यांनी यामध्ये राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात लढला आणि यापुढेही तो लढत राहणार आहे.” यावर अमित शहा यांनी सांगितले की, “एका शूर सैनिकाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना स्पष्ट संदेश दिला आहे. एकीकडे संपूर्ण राष्ट्र एकवटलेले आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनीदेखील राजकारण करण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी एकजुटीने उभे राहिले पाहिजे.” असे मत व्यक्त केले आहे.