मुंबई (अक्षय मांडवकर) - निसर्ग चक्रीवादळाने उद्दध्वस्त झालेल्या वेळास गावाच्या किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेले सागरी कासव आज वाहून आले होते. मच्छीमारांच्या प्रसगांवधानामुळे कासवमित्रांनी या कासवाची जाळ्यातून सुखरुप सुटका केली आणि त्याला पुन्हा समुद्रात सोडले. आजच्या 'जागतिक सागरी कासव दिनी' कासवमित्र आणि मच्छीमारांनी या कासवाला जीवदान दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
मच्छीमारांकडून समुद्रात अनावधाने सुटलेली जाळी सागरी जीवांसाठी घातक ठरतात. समुद्राच्या प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या या जाळ्यांमध्ये बऱ्याचदा समुद्री कासवे किंवा डाॅल्फिन, पाॅरपाईजसारखे सागरी सस्तन प्राणी अडकतात. त्यातून स्वत:ची सुटका करुन घेण्याच्या झटापटीत बऱ्याचदा त्यांचा जीव जातो. अशा जाळ्यांना 'घोस्ट नेट' म्हटले जाते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खवळलेल्या समुद्रामुळे जाळ्यात अडकलेले हे जीव किनाऱ्यावर वाहून येतात. असेच जाळ्यात अडकलेले एक सागरी कासव आज संध्याकाळी मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर वाहून आले होते. किनाऱ्यालगत मासेमारी करणारे मच्छीमार फिरोज दाभिळकर यांना हे कासव दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखून याची माहिती कासवमित्र मोहन उपाध्ये यांना दिली. उपाध्ये यांनी लागलीच जाळे कापून त्याची पुन्हा समुद्रात सुटका केली.