नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवरील गलवान घाटी येथे झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान हुतात्मा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये लडाख सीमेवरील गलवान घाटीत हिंसक चकमक झाली आहे. यामध्ये भारताच्या किमान २० सैनिकांचा मृत्यू झाला असून चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या ४३ आहे, असे सांगण्यात येत आहे.
याआधी ग्लोबल टाईम्सच्या एका रिपोर्टरने भारत-चीन सीमेवर ५ पीएलए सैनिक मृत आणि ११ जखमी झाल्याची माहिती दिली होती. यानंतर काही काळाने ग्लोबल टाईम्सने ट्विट करत आम्ही या घटनेबद्दल अधिकृतरित्या स्पष्टता देत नाही, असे म्हटले होते. अद्याप अधिकृतरीत्या या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली.