महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि या महामारीत जनतेने काय करू नये आणि काय करावे, याची नकळतपणे शिकवण दिली. मात्र, जनता एवढी निर्ढावलेली निघाली की, जे करू नये, तेच नेमके करताना दिसते आणि परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो. शिंकणे, थुंकणे यातून या कोरोनाचा फैलाव होतो. त्यामुळे एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून चालणे आणि तोंडावर मास्क लावणे हाच यावर एकमेव उपचार आहे. परंतु, सुमारे अडीच महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’नंतर राज्य शासनाकडून थोडी शिथीलता देण्यात आल्यानंतर कोरोना जणू पळालाच, अशा आविर्भावात लोक सैराट सुटले. शेवटी ‘...तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल’ असा इशारा मुख्यमंत्र्यांना द्यावा लागला. जर पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याची वेळ आली, तर तो पहिल्यापेक्षा अधिक कडक असेल याची जाणीव जनतेने ठेवायला हवी. ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे समाजसुधारकांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘तूच तुझा तारणहार’ हे तत्त्व प्रत्येकाने अंगी बाणवायला हवे, तरच कोरोनाला आपण हरवू शकू; अन्यथा अनेक ‘कोरोना योद्धे’ धारातीर्थी पडतील, पण कोरोना हद्दपार होणार नाही. तो अधिक आक्रमक होईल आणि आपले जीवनच शून्यवत होईल. ‘आपल्याला आता कोरोनाबरोबर जगायची सवय लावून घ्यायला हवी’ असे म्हणत कोरोना इतक्यात जाणार नाही, हे शासनकर्त्यांनी त्यांच्या उक्तीतूनच कबूल केले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता सावध भूमिका घ्यायला हवी. ‘लॉकडाऊन’ शिथील करण्याच्या वेळी मुंबईची रुग्णसंख्या दिवसाला १००० ते १२००च्या आसपास होती. पण ‘लॉकडाऊन’ शिथील केल्यानंतरच्या चारपाच दिवसांनंतर रुग्णसंख्या १५००च्या पुढे गेली आहे. त्यापैकी मृत किती याचा थांगपत्ताच नाही. मनुष्यबळ कमी म्हणा वा मृतांची संख्या कमी दाखवायची म्हणून असेल, रुग्णालयातूनच रुग्ण गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी आहेत. मात्र, अजूनपर्यंत गायब रुग्ण न सापडता त्यांचे मृतदेह रुग्णालयाच्या बाहेर बेवारस अवस्थेत सापडले आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात संघर्ष केलेल्या माणसाच्या हालअपेष्टा त्याच्या मृत्यूनंतरही संपलेल्या नाहीत. म्हणून स्वयंशिस्त पाळा आणि आपणच आपले तारणहार व्हा!
- अरविंद सुर्वे