लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच चालतोय महापालिकेचा कारभार

    10-Jun-2020
Total Views |

BMC_1  H x W: 0
मुंबई : कोरोना महामारीचे संकट वाढत आहे. आता पावसाळ्याचे आजारही सुरू होतील. तरीही महासभा, स्थायी समिती अथवा गटनेत्यांची अडीच महिन्यात बैठक झालेली नाही. लोकप्रतिनिधीना विश्वासात न घेताच प्रशासनाचा कारभार चालला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.



पावसाळा तोंडावर आला असताना कोरोना आणि पावसाळी आजारांवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी गटनेता, सभागृह व स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे. यासाठी पालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सपाचे गटनेते यांनी महापौर व स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यात कधीही पावसाला सुरुवात होईल. पालिका आयुक्तांनी ३१ मार्चला स्थायी समितीत कोरोना संदर्भात निवेदन केले. त्यानंतर आतापर्यंत एकाही बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सदस्यांची मते व उपाययोजना तसेच पावसाळ्यात प्रशासनाने काय उपाययोजना केल्या यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे गटनेता बेठक, सभागृहाचे आयोजन व स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे. काँग्रेसचे महापालिका विरोधी पक्षनेते रविराजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव व सपाचे रईस शेख यांनी बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली आहे. गटनेत्यांची बैठक १७ मार्चला पार पडली. या बैठकीत आयुक्तांनी कोरोना विषाणू संदर्भात निवेदन केले होते. त्यानंतर आजपर्यंत कुठल्याही बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही.