नवी दिल्ली : दिल्ली पोलीस आणि लष्करी गुप्तचर यंत्रणा यांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी उच्चायोगातील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अबिद हुसैन, ताहीर खान अशी अटक करण्यात आलेल्या हेरांची नवे असून ते पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय़एसआयच्या संपर्कात होते.
परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याआधी २०१६मध्ये पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती. “राजनैतिक दूतावासाशी संबंधित असूनही पदाला न शोभणारे, विसंगत कार्य केल्याबद्दल दोघांनाही २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण करणारी कृती केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी ‘ऑफिशिअल सिक्रेट कायद्या’तंर्गत गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हेरगिरीचे आरोप फेटाळले आहेत. राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी हे विएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.