मुंबई : कोरोना विषाणूंच्या जगभर झालेल्या थैमानामुळे जगभरामध्ये क्रीडा विश्वला खूप मोठा फटका बसला आहे. भारतामध्ये आयपीएलची स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. अशामध्ये सर्वच क्रिकेट मंडळांपुढे आर्थिक चणचण दूर करण्याचे एक मोठे आव्हान समोर आहे. यामधून बाहेर पाडण्यासाठी बीसीसीआय २ भारतीय संघ एकाच वेळी २ वेगवेगळ्या दौऱ्यासाठी पाठवू शकतो. त्यामुळे एकाचवेळी भारताचे २ संघ मैदान दिसंयची शक्यता आहे. अर्थात बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली नसली, तरीही क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी हा पर्याय सुचवला असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एक संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळू शकतो. तर दुसरीकडे लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवण्याची बीसीसीआयची योजना असल्याची माहिती देण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयचे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान लवकर भरून काढायचे असून यासाठी बीसीसीआयने ही नवीन शक्कल लढवली आहे. यामुळे बीसीसीआयचे उत्पन्न वाढेल आणि नुकसान भरून काढता येईल. असे प्रत्यक्षात झाल्यास क्रिकेट चाहत्यांसाठी ही खूप मोठी मेजवानी असले.