भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
करमाड : औरंगाबादमध्ये शुक्रवारी सकाळी बदनापूर-करमाड स्टेशन दरम्यान रेल्वेच्या मालगाडीने १९ जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या औरंगाबाद रेल्वे अपघाताची चौकशीचे आदेश रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. या अपघातानंतर रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसर, रेल्वे ट्रॅकवर काही मजूर झोपल्याचे दिसताच मालगाडीच्या लोको पायलटकडून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न झाला परंतून तो अयशस्वी ठरल्याने पुढे अनर्थ झाला. परभणी मनमाड सेक्शनच्या बदनापूर आणि करमाड स्थानका दरम्यान अपघात झाला. दरम्यान यामधील जखमींना औरंगाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरू आहेत अशी माहिती भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करताना केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना या दुर्घटनेची कसून चौकशी करत याप्रकरणाकडे नीट लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.
आज सकाळी पाच-सव्वापाचच्या सुमारास हा अपघात झाला. जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी घरी परतण्यासाठी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री चालत चालत ते करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे रेल्वे रुळावरच झोपले. आज पहाटे जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली आल्याने यामधील १६ जणांचा दुर्देवी अंत झाला आहे.