पालघर : गडचिंचले गावात साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर तब्बल २० दिवसांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली या प्रकाराचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून या हत्याकांडामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारावाई करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनिल भूसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, वसई विरार महानगरपलिकेचे आयुक्त . गंगाथरण, पोलीस अधिक्षक गौरव सिंह उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदि उपस्थित होते.
राज्यामध्ये ४ हजार ७३८ मदत शिबिर केंद्र असून या मदत शिबिरात १ लाख ३५ हजार बेघरांना आश्रय देण्यात आला आहे मदत शिबिरात त्यांना नाश्ता, जेवन व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कोरोना बांधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ४ लाख ३५ हजार व्यक्तींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात विनाकारण वाहनसह फिरणाऱ्यांकडून ३ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ५३ हजार ३३० वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच जिल्हा बंदी असताना जे लोक दुधाची गाडी, टॅकर, सिमेंट मिक्शर किंवा इतर वाहनाने प्रवास करत होते अशा १२८१ अवैध वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील आठ कारागृह क्वॉरंटाईन
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कारागृहामध्ये कोरोनाचा संसंर्ग पसरू नये म्हणून राज्यातील आठ तुरुंग क्वॉरंटाईन करण्यात आले होते. कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली होती. या काळात बाहेरचा व्यक्ती कारागृहात प्रवेश करु शकत नव्हता तसेच मधील व्यक्ती कोणत्याही कामाने बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मुंबईतील आर्थर रोड जेल मध्ये स्वयंपाक करणाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील ७२ कैद्यांना देखील कोरानाची लागण झाली आहे. या कैद्यांना बृहमुंबई महानगर पालिकेच्या सहकार्यांने महानगर पालिका क्षेत्रात क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
आवश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी मुंबईत कार्यरत असून त्यांचे निवासस्थान मुंबईच्या बाहेर आहे. अशा अधिकारी, कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था करण्याचा विचार राज्याशासन करत आहे. राज्यशासनाने कोव्हिड-१९ बाबत नागरिकांना जनजागृती व्हावी तसेच त्यांना योग्य माहिती मिळावी या उद्देशाने राज्यशासनाने हेल्पलाईन चालू केली आहे. नागरिकांनी या हेल्पलाईनला प्रचंड प्रतिसाद देत ८ लाख ५३ हजार नागरिकांनी या हेल्प लाईनच्या माध्यमातून संपर्क साधला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.