नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण केले. या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून मोदींनी पत्र लिहीले आहे. कोरोनाच्या संकटकाळात देशवासीयांना धीर दिला आहे. कोरोनाच काय अन्य कुठलेही संकट १३० कोटी भारतीयांचे भविष्य किंवा वर्तमान ठरवू शकत नाही, आम्ही आपले वर्तमान आणि भविष्य स्वतः ठरवू. आम्ही पुढे जाऊ, प्रगती पथावर पुन्हा भरारी घेऊ, विजयी होऊ. कोरोना जेव्हा भारतावर आक्रमण करेल तेव्हा जगभराच्या तुलनेत आपल्या देशात हाहाःकार माजेल, अशी भीती अनेकांना होती. मात्र, आपण ही शक्यता मोडीत काढून या संकटकाळात जगाला सामर्थ्य दिले. सर्वांनाच भारतीयांना सकारात्मक दृष्टीकोन दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात गेल्या कार्यकाळातील महत्वकांशी प्रकल्पांचा उल्लेख करत वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. वर्षभरात घेतलेले निर्णय हे विशेष चर्चेत राहिले, असे मोदी म्हणाले. गेल्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधानांनी पत्रात उल्लेख केला आहे. देशाने एका मोठ्या परिवर्तनासाठी आम्हाला बहुमत दिले होते. पाच वर्षांमध्ये देशाने व्यवस्थेला भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आहे. अंत्योदय योजनेतून देशवासीयांचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. याच कार्यकाळाच देशातील प्रत्येक गरीबाचे बँक खाते सुरू झाले. मोफत गॅस कनेक्शन मिळू लागले. प्रत्येकाला घर आणि शौचालय देऊन गोरगरीबांना आत्मबळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकसारख्या थरारातून देशाने शत्रुला घुसून नामशेष केले. वन रँक, वन नेशन, वन नेशन वन टॅक्स म्हणजेच जीएसटी, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत आदींसारख्या योजनाही आणल्या. राष्ट्रीय अखंडतेसाठी कलम ३७० हटवून देश एकसंध केला. राम मंदिराच्या निर्माण, तिहेरी तलाक, देशाच्या करुणेचे प्रतिक असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणण्यात आला. हे या सरकारचे यश आहे. अनेक ऐतिहासिक निर्णयांच्या अंतर्गत अनेक निर्णय घेण्यात आले. भारताच्या विकासयात्रेला नवी दिशा मिळाली. जनतेच्या अपेक्षाही पूर्ण झाल्या. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) हे नवे पद गठीत करून सैन्यदलातील समन्वय वाढला.
'मिशन गगनयान'साठी भारत तयारी करत आहे. याच दरम्यान, गरीबांना, शेतकऱ्यांना, महिला आणि युवा वर्गाला सशक्त करणे ही आमची प्रार्थमिकता आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी जोडला गेला आहे. या योजनेअंतर्गत ९ कोटी ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ७२ हजार कोटींहून अधिक निधी वर्ग करण्यात आला आहे. भारतात गतीने पसरणाऱ्या कोरोना संदर्भातही पंतप्रधानांनी उल्लेख केला आहे. 'कित्येक लोकांनी भारताविषयी भाकित केले होते, देशावर जेव्हा कोरोनाचे संकट येईल, तेव्हा देश जगाला एका संकटात ढकलेल. परंतू त्यांचा हा समज देशवासीयांनी मोडीत काढला. देशाने सिद्ध केले कि सामर्थ्यवान आणि संपन्न देशाच्या तुलनेत आपण मोठे सामर्थ्य दाखवले. थाळीनाद, एक दिवा देशासाठी आणि कोरोना योद्ध्यांना सन्मान, जनता कर्फ्यूला मिळालेला पाठींबा, त्या दरम्यान देशाने जगाला दाखवून दिले आहे कि, देशावर आलेल्या संकटकाळी आपण एकत्र येऊन सामना करू शकू, देशभरातील मजूर बंधू भगिणी ज्या आपापल्या गावी गेल्या आहेत. छोट्याछोट्या उद्योगांमध्ये काम करणारे, किरकोळ दुकानदार यांची सोय व्हावी, त्यांच्या कल्याणासाठी काही करता येईल का या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले आहे.