नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी मुंबईकर फलंदाज रोहित शर्माची शिफारस बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. तर, अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने भारतीय संघ धडाकेबाज फलंदाज शिखर धवन, जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यांच्यासह महिला क्रिकेट संघातील दीप्ती शर्मा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा याने २०१९च्या विश्वचषकामध्ये ५ शतक केले. त्यानंतर कसोटी संघामध्येही चांगली कामगिरी करत दमदार पुनरागमन केले. यामुळे रोहितचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पुढे करण्यात आले. तर शिखर धवनची दुसऱ्यांदा अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यापूर्वी २०१८मध्ये त्याच्या नावाची शिफारस करण्यात आली होती मात्र अंतिम यादीत त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. तर दुसरीकडे इशांत शर्माच्या कसोटीमधील कामगिरीवर तर दीप्ती शर्माच्या गेल्या वर्षामध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर त्यांची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली.