सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |
Veer Savarkar- _1 &n
 




सावरकर आणि अल्पसंख्याक धोरण या विषयावर दीर्घ चिंतन होणे आवश्यक आहे. उगाच कोणीही उठावं आणि कोणतीही माहिती जाणून न घेता सावरकरांबद्दल, त्यांच्या हिंदुत्वाबद्दल, अल्पसंख्याक धोरणाबद्दल बोलावं, इतका हा साधा सोपा विषय नाही. इंटरनेटवर माहिती शोधून, पुस्तकं वाचून सावरकरांबद्दल समजेल, पण ‘सावरकर’ समजतीलच असं नाही.




 सावरकर ही केवळ एक व्यक्ती नसून एक प्रगल्भ विचारसरणी आहे. धर्म, शास्त्र, दूरदृष्टी, देशभक्ती आणि निःपक्षपतीपणाच्या भरभक्कम आधारावर उभी असणारी ही विचारसरणी आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर असतानाही उपयोगी पडणारी आहे. सावरकरांना विरोध नक्की कशासाठी? त्यांच्या हिंदुत्वासाठी? मग विरोधकांनी हा विरोध करताना त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या जाणून घ्यायचा साधा प्रयत्न तरी केला आहे का? हिंदुत्व म्हणजे काय? जसं आईचे ममत्व, पित्याचे पितृत्व, कार्याचे उत्तरदायित्व तसेच, हिंदुस्थानाचे हिंदुत्व. ही संज्ञा सर्वप्रथम बंगाली साहित्यिक चंद्रहास बसू यांनी त्यांच्या ‘हिंदुत्व’ (१८९२) या ग्रंथात वापरली होती. तसेच टिळक व आगरकर यांनी अनुक्रमे त्यांच्या ‘केसरी’ व ‘सुधारक’मधील लेखात ‘हिंदुत्व’ या शब्दाचा उल्लेख केला होता. पण, तरीही सावरकरांचं हिंदुत्व देशाला घातक आहे असे वारंवार म्हणणार्‍यांसाठी सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल थोडंसं -
 

 
सावरकरांची ‘हिंदू’ शब्दाची व्याख्या-


॥ आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥



सोप्या शब्दात सांगायचं तर सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत पसरलेल्या भूमीला जे पितृभूमी व पुण्यभूमी मानतात ते सर्व लोक हिंदू आहेत. पितृभू म्हणजे केवळ वडिलांची भूमी नव्हे. पितृभू म्हणजे पितर किंवा वाड-वडिलांची भूमी, यात आई-वडील, आजी-आजोबा या सगळ्या पितरांचा समावेश होतो.


या व्याख्येमधील ‘पुण्यभू’ या शब्दाबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला आहे. हा शब्द सावरकरांनी मुस्लिमांना वगळण्यासाठी मुद्दाम लिहिला आहे, असा अत्यंत चुकीचा समज पसरविण्यात आला आहे. मुळात हा आक्षेपच हास्यास्पद आहे. ही व्याख्या ‘हिंदू’ या शब्दाची आहे, ‘भारतीय’ या शब्दाची नाही. ‘हिंदू’ शब्दाच्या व्याख्येत फक्त हिंदूंबद्दलच सांगितलं जाणार, त्यामध्ये इतर धर्मीयांना सामावून घेतले जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरं ‘हिंदू’ या शब्दाच्या व्याख्येत सामावून घेतलेलं इतर धर्मीयांना चालेल का? या व्याख्येनुसार ज्यांची पुण्यभूमी या देशात नाही, ते हिंदू नाहीत, इतकंच सावरकरांना म्हणायचे आहे. याचा अर्थ मुसलमानांचे किंवा इतर धर्मीयांचे नागरिकत्व नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे? पाण्याचा केमिकल फॉर्म्युला H२O हा आहे. 'H' म्हणजे हायड्रोजन आणि 'O' ऑक्सिजन. आता 'H' म्हणजे हायड्रोजन म्हटलं म्हणजे पाण्यामधले 'O'चे अस्तित्व नाकारले, असा अर्थ होतो का? तसंच ‘हिंदू’ शब्दाच्या व्याख्येत फक्त हिंदूबद्दलच लिहिलं आहे.


सावरकरांचे हिंदुत्व


 
‘हिंदू’ या शब्दाच्या व्याख्येनंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘हिंदुत्व. ’ ‘हिंदुत्व’ हा शब्द धार्मिक नाही, तर सामाजिक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. साध्या सोप्या शब्दांत सांगायचे, तर हिंदूंच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण म्हणजे हिंदुत्व. आता पुन्हा यावर आक्षेप नको. कारण, फक्त हिंदूंच्याच न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण करा, असे सावरकर कधीही म्हणालेले नाहीत.

 
 
सावरकरांची ‘हिंदूराष्ट्रा’ची संकल्पना


सर्व नागरिकांना समान अधिकार व कर्तव्ये
 
 
नागरिकांचे अधिकार व त्यांची राष्ट्राप्रति असणारी कर्तव्ये समान असावीत. ती जात, धर्म, पंथ, वंश यापैकी कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसावीत. या हिंदुस्तानाशी नागरिकांनी पूर्णपणे एकनिष्ठ आणि कृतज्ञ राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. सर्वांना समान मूलभूत अधिकार असावेत.

 
‘हिंदूराष्ट्रा’ची कल्पना कोणत्याही प्रकारे ‘हिंदीराष्ट्रा’शी विसंगत नाही. यामध्ये सर्वधर्मसमभाव दिसून येतो, जो आपल्या घटनेचा मूळ आधार आहे. मग या संकल्पनेमध्ये विरोधकांना नक्की गैर काय वाटतंय? प्रत्येक भारतीय नागरिकांच्या न्याय्य व नागरी अधिकारांचे संरक्षण करणे घटनेनुसार आवश्यकच आहे.


 
सावरकरांनी कधीही अल्पसंख्याकांना असमानतेची वागणूक दिली नाही, याउलट २१ ऑक्टोबर १९३९ साली परळ नवरात्र उत्सवात १५०० लोकांसमोर ’हिंदूंची सद्यस्थिती व कर्तव्ये’ या विषयावर दिलेल्या भाषणात सावरकरांनी सांगितलं होतं- समाजातून अस्पृश्यता नष्ट करायची आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी या सर्व भारतीयांना राजकीय, सामाजिक, नागरी आणि धार्मिक क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत, हे माझे मुख्य राजकीय उद्दिष्ट आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, सावरकर नेहमीच समानतेच्या बाजूने होते.

 
रत्नागिरीमध्ये असताना दसर्‍याच्या दिवशी शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींसह सावरकर काही स्थानिक मुसलमान पुढार्‍यांच्या घरी सोने द्यावयास गेले होते. या मुसलमान पुढार्‍यांनीही त्यांचे चांगले स्वागत केले होते. त्यानंतर त्यांनी ‘ख्रिश्चन मिशन’मध्येही जाऊन ‘मिशन’मधील ख्रिस्ती पुढार्‍यांसही सोने वाटले होते.

 
स्वतः उच्च कुळात जन्म घेऊनही केवळ समाजहितासाठी झटणार्‍या सावरकरांनी जिथे स्वतःच्या धर्मात असणारी असमानता मोडून काढण्याचा प्रयत्न केला, ते सावरकर इतर धर्मांच्या बाबतीत असमानतेचा विचार करतीलच कसा? ‘मी आधुनिक आहे, तरीही मी धर्मभेद पाळणार, माझा विरोध फक्त जातिभेदाला आहे, धर्मभेदाला नाही,’ असं जर का कोणी म्हणत असेल तर, ते कितपत पटेल?

 
सावरकर हे इस्लामद्वेष्टे होते, त्यांना नेहमीच त्यांच्या हिंदूराष्ट्रात हिंदूंना उच्च, तर मुसलमानांसह इतर अल्पसंख्याकांना दुय्यम स्थान द्यायचे होते, त्यांना हिंदूंचा बहुसंख्यावाद अल्पसंख्याकांवर लादायचा होता, अशाप्रकारचे अनेक आरोप सावरकरांवर केले जातात. हे आरोप किती बिनबुडाचे आहेत हे सिद्ध करणारे काही महत्त्वाचे पुरावे -
 


१९३९ साली सावरकरांनी, लखनौमधील शिया मुसलमानांना पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे गोवधबंदी व मशिदीवरून जाताना वाद्य वाजविण्यास संमती, या हिंदूंच्या मागण्या आपणहून मान्य करून त्यांनी दाखवलेल्या खर्‍या राष्ट्रीय वृत्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. सावरकर त्या आभारपत्रात म्हणाले होते, “या शियापंथीयांनी अनुसरलेल्या राष्ट्रीय वृत्तीशी सहकार्य देण्यास हिंदू सभा संपूर्णत: तयार आहे; नव्हे, अशा राष्ट्रीय व न्यायप्रिय बंधूंशी सख्यत्व ठेवण्याची तिची तीव्र इच्छा आहे. अशा प्रकारे समान एकीची भूमिका स्वीकारण्यास जेव्हा बाकीचे हिंद्वेतर तयार होतील, त्याचवेळी हिंदूराष्ट्रात हिंदू-अहिंदूंची राष्ट्रीय एकी निर्माण होईल.” (संदर्भ: केसरी, दि. १ ऑगस्ट १९३९) इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सावरकरांनी शिया मुसलमानांचा उल्लेख ‘राष्ट्रीय वृत्ती, राष्ट्रीय व न्यायप्रिय बंधू’ असा केला आहे.


 
सावरकरांनी मुसलमानांच्या ‘न्याय्य अधिकार व मागण्यांना कधीही विरोध केला नाही, उलट त्या मान्य केल्या जातील’ असे स्पष्टपणे नमूद करतात. ‘जगा आणि जगू द्या’ या आदर्श विचारसरणीचे अनुसरण करणे चूक आहे का? आपले न्याय्य अधिकार व हक्क जपताना इतरांच्या न्याय्य अधिकारांना डावलणे त्यांना कदापि मान्य नव्हते. गदा आणणे किंवा हिरावून घेणे त्यांना मान्य नव्हते.

 
मुस्लीम लीग व जिनांनी ५० टक्के राजकीय जागांची मागणी केली तर, काँग्रेसने त्यांना ३० टक्के ते ४० टक्के जागा द्यायची तयारी दाखवली. दोघांमध्ये वाद फक्त १०-२० टक्के जागांसाठी होता. परंतु, २० टक्के अल्पसंख्याकांना ४० टक्के जागा म्हणजे ८० टक्के हिंदूंवर अन्याय नाही का? त्यावेळी समान अधिकारांची विचारसरणी असणार्‍या सावरकरांनी आवाज उठवला, कोणताही धर्म ठेवू नका, त्यास माझी ना नाही पण हिंदू धर्मावर सतत होणारे अन्याय मला मान्य नाही. त्यावेळी सावरकर म्हणाले होते, “मला मुस्लिमांची भीती वाटत नाही, मला इंग्रजांचीही भीती वाटत नाही, मला भीती वाटते ती हिंदूंमधील न्यूनगंडाची. तो आपण काढून टाकायला हवा.”



तुमची ही भीती आज खरी ठरली आहे सावरकर, कशासाठी इतक्या खस्ता खाल्ल्यात तुम्ही? अंदमानात हालअपेष्टा सोसून काय मिळाले तुम्हाला? ज्या एकात्मतेसाठी तुम्ही लढलात, त्याच एकात्मतेच्या तुम्ही विरोधात होता, असा चुकीचा समज पसरवला जातोय, ज्या समाजाच्या हितासाठी तुम्ही आयुष्यभर राबलात, त्याच समाजाने तुमच्या आदर्श विचारसरणीची खिल्ली उडवण्याचा नवा खेळ सुरू केला आहे.



सावरकरांच्या कोणत्याही धोरणाबद्दल लिहायचं म्हटलं तर त्यांच्या प्रत्येक धोरणावर एक कादंबरी लिहून होईल. परंतु, रासबिहारी बोस यांनी मार्च आणि एप्रिल १९३९ मध्ये ‘दाई आजिया शुगी’ या जपानी मासिकात ‘सावरकर - नव्या भारताचा उगवता नेता - कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व!’ या शीर्षकाखाली सावरकरांच्या चरित्रावर लिहिलेल्या लेखाचा दोन वाक्यात लिहिलेला निष्कर्ष सावरकरांबद्दल खूप काही सांगून जातो. त्यांनी लिहिले आहे - “तुम्ही सावरकरांच्या विचारांशी सहमत झालात, तरच तुम्ही राजकीय दृष्टीने सामर्थ्यशाली बनाल. सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्थान अढळ आहे.”



जर समान अधिकारांचा विचार करणे हे न्यायसंगत नसेल, तर तुम्ही चुकलात सावरकर! कारण, तुम्ही नेहमीच समानतेचा विचार केलात. समाजामध्ये तेढ निर्माण करून, जातीयवाद पसरवून राजकारण करून स्वतःचा स्वार्थ साधणे, हेच समाजहिताचे असेल, तर तुम्ही चुकलात सावरकर! कारण, तुम्ही या सार्‍याला नेहमीच विरोध केलात. या समाजाला जिथे सावरकरच समजले नाहीत तिथे त्यांची दूरदृष्टी काय कळणार?
- मानसी जोशी


(संदर्भ : स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव, लेखकः अक्षय जोग, मृत्युंजय प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २०२०)







@@AUTHORINFO_V1@@