नवी दिल्ली : आसामसह मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला जोरदार पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर आला असून अंदाजे २ लाख नागरिक पुराच्या तडाख्यामध्ये अडकले आहेत. धेमाजी, लखीमपूर, दरंग, नलबारी, गोलपारा, दिब्रूगड आणि तिनसुकिया या एकूण १७ महसूल क्षेत्रातील २२ गावे पूरग्रस्त झाली आहेत. एकूण १,९४, ९१६ लोकांना पुराचा फटका बसला आहे. यांपैकी ९००० जणांनी ढेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तीनसुकिया जिल्ह्यातील मदत शिबिरात व्यवस्था करण्यात आली आहे.
पुरामुळे १ हजार ७ हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले असून सुमारे १६ हजार ५०० पाळीव प्राण्यांसह कुक्कुटपालनावर परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतेक नद्यांनी सोनीतपूर आणि नेमाटिघाट (जोरहाट) मधील जिया भराली आणि ब्रह्मपुत्र या धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिली आहे.
येत्या २ ते ३ दिवसांमध्ये आसाम आणि मेघालय परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या तीनही राज्यांची परिस्थिती गंभीर होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. लोकांना पूर आणि भूस्खलनापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत.