मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या कोरोनाच्या प्रदुर्भावावर नियंत्रण मिळण्यासाठी राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्येही विसंगती असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्तेत असलेल्या आघाडी सरकारची यावरून चांगलीच शाळा घेतली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले की, “राहुल गांधीचे वक्तव्य हे जबाबदार झटकणारे आहे. असे करून सर्व खापर हे शिवसेनेवर फोडण्याची लक्षणे आहेत.”
महाराष्ट्राच्या राजकारणावर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी, “आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा देत आहोत. मात्र, राज्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे सरकार चालविणे आणि सरकारला पाठिंबा देणे, यातला फरक समजून घेणे गरजेचे आहे.” असे वक्तव्य केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेत, “राहुल गांधींचे हे वक्तव्य अतिशय आश्चर्यकारक आहे. कोरोना हाताबाहेर जात असल्याचे पाहता परिस्थितीचा ठीकरा शिवसेनेवर फोडून आपण वेगळे व्हायचे असा हा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे, राहुल गांधींचे वक्तव्य जबाबदारी झटकण्यासारखे आहे. अशामध्ये राज्य सरकारचे सहकारीसुद्धा त्यांची साथ सोडत असताना दिसून येत आहेत.” अशी टीका त्यांनी केली आहे.