रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी ३५ लाख मजुर पोहोचले घरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2020
Total Views |
Vinod kumar_1  

येत्या १० दिवसात आणखी २६०० विशेष रेल्वेगाड्या धावणार



नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत धावलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांद्वारे सुमारे ३५ लाख मजुर स्वगृही परतले आहेत. येत्या १० दिवसात धावणाऱ्या २६०० विशेष रेल्वेगाड्यांद्वारे आणखी ३५ लाख मजुरांना घरी पोहोचविले जाईल, अशी माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.


कोरोना संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने अभुतपूर्व कामगिरी नोंदविली आहे. त्याविषयी पत्रकारपरिषेत माहिती देण्यात आली. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव म्हणाले, टाळेबंदीमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी १ मे पासून श्रमिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी राज्यांसोबत समन्वय साधण्यात आला होता. आजपर्यंतची परिस्थिती पाहिल्यास १ मे रोजी ४ रेल्वेद्वारे सुमारे ४ हजार प्रवासी आपल्या घरी पोहोचले, तर २० मे रोजी पर्यंत दिवसाला २७९ रेल्वेद्वारे ४ लाख प्रवाशांना घरी सोडण्यात आले. गेल्या चार दिवसात २६० रेल्वे सोडण्यात आल्या. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ३५ लाख स्थलांतरीत मजुरांना रेल्वेने स्वगृही सोडले आहे. पुढील १० दिवसांमध्ये २६०० विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्याद्वारे सुमारे ३६ लाख मजुर आंतरराज्य तर सुमारे १० लाख मजुर राज्यांतर्गत प्रवास करणार आहेत. राज्यांनी विनंती केल्यास त्यांच्यासाठी कोणत्याही रेल्वे स्थानकावरून रेल्वे सोडण्यात येणार आहे, असे यादव यांनी सांगितले.


स्थलांतरीत मजुराप्रमाणेच सर्वसामान्य प्रवाशांसाठीदेखील आतापर्यंत विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून १ जून पासून २०० प्रवासी गाड्या धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन तसेच तिकीट खिडकी, आरक्षण एजंट आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर तिकीटे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार स्थानकांवरील विक्री स्टॉलदेखील सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.


भारतीय रेल्वे आरोग्य सुविधांच्या बाबतीतही आपले योगदान देत असल्याचे यादव यांनी सांगितले. ते म्हणाले, रेल्वेने आपल्या ५००० डब्यांचे रुपांतर कोव्हिड केअर सेंटरमध्ये केले असून त्यामध्ये ८० हजार खाटांची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी ५० टक्के डबे सध्या श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी वापरण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेच्या १७ इस्पितळांने कोव्हिड विशेष इस्पितळे म्हणून घोषित करण्यात आले असून त्यामध्ये ५ हजार खाटांची सोय आहे तर अन्य ३३ इस्पितळांमधील काही ब्लॉक्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच १० हजार विलगीकरण खाटांचीही सोय रेल्वेने देशभरात विविध ठिकाणी केली आहे.


रेल्वेने आपल्या कार्यशाळांमध्ये पीपीई किटची निर्मीती करण्यास सुरुवात केली आहे. दरदिवशी सुमारे ४००० किट तयार करण्यात येत असून आतापर्यंत १ लाख २० हजार किट्स तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फेसमास्क आणि हँड सॅनिटायझरचीदेखील निर्मिती करण्यात येत आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वे २४ तास कार्यरत आहे, सर्वसामान्य परिस्थितीच्या तुलनेत सध्या नेहमीपेक्षा दुप्पट धान्याची वाहतूक करण्यात येत आहे. विजनिर्मिती केद्रांना पुरेशा प्रमाणात कोळसाही पुरविला जात आहे. त्याचप्रमाणे रेल्वेने बेघर तसेच आर्थिकदृष्टा दुर्बलांसाठी अन्नछत्रेदेखील सुरू केल्याचे यादव यांनी नमूद केले.
@@AUTHORINFO_V1@@