नवी दिल्ली : जगभरामध्ये अनेक देश कोरोनाशी युद्ध लढत आहेत. विविध देशांमध्ये काही भारतीय अद्याप अडकले असून आता त्यांच्यासाठी केंद्र सरकार तयारी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाउनमुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी भारतीय नौदल सज्ज झाले आहे.
“आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही १४ युद्धनौका तयार केल्या आहेत. त्यातील चार वेस्टर्न कमांडमध्ये, चार पूर्वेकडील कमांडमध्ये आणि ३ दक्षिणी कमांडमध्ये आहेत. तसेच आखाती देशांमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे अनेक युद्धनौका सज्ज आहेत. ” अशी माहिती नौदलाचे व्हाईस अॅकडमिरल जी अशोक कुमार यांनी दिली आहे.