मुंबई : “मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपले अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते.” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पुढे ते हेही म्हणाले की, स्वतः एकही दमडीचे काम केले नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी २००७मध्ये अहवाल सादर केला होता. २००७ ते २०१४ दरम्यान केंद्र किवा राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यासंबंधीच पत्र किंवा साधा अर्जही पाठवण्यात आला नाही. त्याच काळात २००७ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या संधीचा फायदा घेतला. २०१२पर्यंत कार्यवाही पूर्ण केली आणि काम सुरु केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
डिसेंबर २०१९मध्ये केंद्र सरकारने वित्तीय सेवा केंद्र नियमनासाठी प्राधीकरण गठीत केले आणि त्याचे मुख्यालय हे अहमदाबाद येथे अधिसूचित केले आहे. तसेच आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत ते २००७ ते २०१४ या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.