आता आम्ही तब्बल ५० दिवसांनी घराबाहेर पडलो आहोत. मग इतक्या २० लाख कोटींचा सवाल आहे. पॅकेज वाटणार हे ऐकल्याक्षणापासून आम्हाला अशी तरतरी आली की विचारता सोय नाही. कोरोना-फोरोनाची भीती गायबच झाली. इलेक्शनच्या वेळेसपण आमची भीती अशीच गायब होते. आठवते ना ते आमचे पावसात भिजणे. अहो, कोणालाही पावसात भिजतानाचे इतके फुटेज भेटले नसतील तितके फुटेज आम्हाला भेटले. या वयात आम्ही पावसात भिजलो म्हटल्यावर आपल्या भोळ्या-भाबड्या लोकांची मनं पण दयेने भिजली. तर काय म्हणतो मी की, कुठे कधी काय कसे वागावे, याचे आम्हाला चांगलेच ‘टायमिंग’ आहे. अचूक टायमिंग, कुणाला हात द्यावा आणि कुणाला हात दाखवावा, याबद्दल तर आमचा हात कुणीच धरू शकत नाही. हे त्या हातवाल्यांनाही चांगलेच माहिती आहे. त्यामुळे त्यांचा हात ते नेहमी घड्याळाने बांधून ठेवतात. पर्यायच नाही त्यांना. हं... तर काय म्हणत होतो की, आता घराबाहेर निघायचे दिवस आले आहेत, याची जाण आम्हाला झाली आहे. आता आम्ही बाहेर निघालोय. कारण, हे पॅकेज आले आहे. ते गोरगरीब जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी आहे. मी सर्वात जास्त पॅकेज मागेन. कारण, महाराष्ट्रमध्ये कोरोनाचे संकट जास्त आहे. काय म्हणता, आमची सत्ता आहे? हो! मग आमचीच सत्ता आहे. म्हणून तर पॅकेज मागतोय ना? पॅकेज मिळाले की मग आम्ही कामाला लागू. दिल्ली, वांद्रे आणि बारामती अशा तीन केंद्रांवर टप्प्या टप्प्याने बैठका घेऊ, टप्प्या टप्प्याने रूसव्या-फुगव्याचे नाटक करू. त्यात जातील काही महिने. काय म्हणता त्या काळात जनतेचे काय होणार? हे बघा, मोदींनी सांगितलंय ना, आत्मनिर्भर व्हा. थाळ्या वाजवल्या, दिवे काय लावले मग जनतेने आता मोदींचे ऐकून आत्मनिर्भरही व्हावे. तसेच आम्ही बनवलेल्या मुख्यमंत्र्यांचेही ऐकावे. कोमट पाणी प्या, भेंड्या खेळा. मला विचाराल तर आम्हाला पॅकेज मिळाल्यावर सांगेन काय करायचे ते... आताच तर घराबाहेर पडलोय.
हम मोदी को मारेंगे
‘हम मोदी को मारेंगे,’ हे वाक्य कुण्या हिंस्त्र दहशतवाद्याचे नाहीत किंवा त्या दहशतवाद्यांची पाठराखण करणार्या मानवतावादी मुखवट्यांचेही नाहीत. तर हे वाक्य एका बालकाने म्हटले आहे. दुधाचे दातही तुटले नसतील, पण ते बालक मोदींना मारण्याची भाषा करत आहे. मुले देवाघरची फुलेच असतात. अशा या निष्पाप बालकाच्या ओठी कुणाला मारण्याची इतकी तिरस्कृत भाषा येऊच कशी शकते. पण मुलं तेच बोलतात जे ते ऐकतात. त्यामुळे या बालकाच्या ओठातले वाक्य हे त्याच्या आजुबाजूच्या मोठ्या व्यक्तींच्या मनातला द्वेषच आहे. समाजबांधवांच्या अज्ञानाचा, त्यांच्या वंचित अवस्थेचा वापर समाजात दुही, अस्थिरता माजवण्यासाठी करणे यात तर फुटीरतावाद्यांचा हात कुणीही पकडू शकत नाही. अर्थात, या सगळ्या पाठचे गणित राजसत्ता आहे. देशावर सतत प्रस्थापित करण्यासाठी लोकांना धर्माच्या नावावर उकसवणे सोपे असते. त्यामुळेच ‘इस्लाम खतरेमें हैं’ची बांग सदोदित हे लोक देत असतात. ८०० वर्षे जुलमी राजवट केल्यावर, लोकांना दमनाने धर्मांतर करायला लावल्यावरही जर या देशात ‘इस्लाम खतरे में’ असेल तर यासारखा दुसरा खोटारडेपणा नाही. ‘गंगा-जमनी तहजिब’ किंवा ‘अल्ला तेरो नाम इश्वर तेरो नाम’ वगैरेची जपमाळ कितीही ओढा, तरीही आजही काही लोक आहेतच की ज्यांना या देशावर संविधानाचे राज्य किंवा लोकशाही नको आहे. त्यांना या देशात हिंसा दहशतवाद माजवायचा आहे. त्यामुळे हे लोक लहान मुलांना हत्यार बनवून त्यांना समाज आणि देशद्रोही बनवत आहेत. मेल्यानंतर स्वर्ग मिळावा, ७२ हूर-ऐषाराम मिळावा म्हणून ही थेरं केली जातात म्हणे. पण मग बालकांच्या निष्पापतेचा बळी देऊन त्यांना हिंस्त्र, द्वेषी बनवणार्यांना अल्लाताल्ला कयामतच्या रात्री सुकून देईल की दोजख देईल? आपल्या कर्माची फळं आपल्याला काय मिळणार? याची जाणीव जेव्हा या लोकांना होईल त्या वेळी ते बालकांना हत्यार बनवायचे सोडतील. मग कदाचित कुणी बालक म्हणताना दिसणार नाही की, ‘हम मोदी को मारेंगे..!’