कर्जाचा वाढता डोंगर...कर्मचारी कपातीची टांगती तलवार
नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीचा फटका विमान वाहतूक कंपन्यांनाही बसला आहे. या क्षेत्रांतील रोजगारांवर कुऱ्हाड कोसळली असून एका अहवालात नमूद केल्यानुसार, २०२१मध्ये विमान वाहतूक कंपन्यांच्या क्षेत्रातील महसूलात ४४ टक्क्यांनी घट झाली आहे. 'इंक्रा' या संस्थेच्या अहवालानुसार, विमान कंपन्यांना आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी एकूण ३५० अब्ज रुपये इतक्या मदतीची अपेक्षा आहे.
देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांचा विचार केल्यास २०२१मध्ये ४१ ते ४६ टक्के घसरण येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना ६७-७२ टक्के घट सहन करावी लागणार आहे. देशव्यापी लॉकडाउनमुळे विमान कंपन्यांचे दररोज ७४ ते ९० कोटींचे नुकसान होत आहे. लॉकडाऊन उठल्यानंतरही प्रवासी क्षमतेत वाढ होताना जाणवणार नाही. या क्षेत्राला उभारी घेण्यासाठी ३२५ ते ३५० अब्ज रुपये इतक्या आर्थिक मदतीची गरज आहे.
२०२१-२२ मध्ये विमान कंपन्यांवरील कर्जाची रक्कम ही ४ हजार ६५0 कोटी इतकी वाढणार आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी विमान वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. या कारणास्तव देशांतर्गत विमान वाहतूकीला गेल्या सात वर्षातील सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागणार आहे. अशातच पूर्वीपासून काही कंपन्या आर्थिक संकटात आहेत. बहुतांश विमान कंपन्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. कर्मचारी कपात, रखडलेले कर्मचाऱ्यांचे वेतन आदी समस्या विमान कंपन्यांसमोर आहेत.