कांदिवलीच्या बाजूने उद्यानाच्या हद्दीत अतिक्रमण वाढले
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लाॅकडाऊन लागू झाल्यापासून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'भोवती (नॅशनल पार्क) अतिक्रमणाचा विळखा वाढत असल्याचे समोर आले आहे. विहार तलावानजीक साई बांगोडा गावाजवळ राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत झालेले अतिक्रमण ताजे असताना आता कांदिवली ठाकूर व्हिलेजच्या दिशेने देखील अतिक्रमण वाढले आहे. लाॅकडाऊनचा फायदा उचलून हे अवैध बांधकाम सुरू असल्याचे उद्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बोरिवली नॅशनल पार्कच्या अखत्यारित येणाऱ्या भागांमध्ये लाॅकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम वाढत आहे. काही दिवसांपूर्वी विहार तलावाजवळील साई बांगोडा गावाजवळ अवैधरित्या वृक्षतोड झाल्याची घटना घडली होती. यापरिसरात प्लास्टिक आणि फाद्यांचे कुंपन घालून जमिनीच्या मोठ्या भागाची छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या परिसरात गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यावर अवैध बांधकाम करण्यांनी हल्ला देखील केला होता. आता कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज परिसरातील नॅशलन पार्कच्या हद्दीत अतिक्रमण वाढले आहे. येथील पाटाचे पाणी या पाड्यामध्ये अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
याठिकाणी दोन दिवसांपूर्वी कारवाईसाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर स्थानिकांच्या गटाने दमदाटी केली. पाटाचे पाणी हा संपूर्ण भाग अनधिकृत वस्तीमध्ये येत असून लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर या भागात अजून काही अवैध बांधकामे वाढल्याचे आमच्या निदर्शनास आल्याची माहिती तुळशी वनपरिक्षत्राचे अधिकारी दिनेश दिसले यांनी दिली. या वाढलेल्या बांधकामावर आम्ही ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने लक्ष ठेवून असून त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांचा वनकर्मचाऱ्यांप्रती असलेले वर्तन लक्षात घेता पोलीस संरक्षणाअंतर्गतच या बांधकामांवर कारवाई करणे उचित ठरणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन संपल्यानंतर पोलीस संरक्षणामध्येच या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.