नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये दोन दुर्घटनांमध्ये एकूण १४ जणांचा मृत्यू झाला. तर ५५हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात बुधवारी रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान पायी जाणाऱ्या सहा मजूरांचा बस दुर्घटनेत मृत्यू झाला. चार जण जखमी झाले असून दोन जणांना मेरठ येथे पाठण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मजूर पंजाबहून बिहारला जात होते. मुझफ्फरनगर-सहारनपूर राज्य महामार्गावरील घलौली चेकपोस्टहून रोहोना टोल प्लाझा येथे नजीक पोहोचल्यानंतर एका बस खाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर वाहन चालक फरार झाला आहे. मृतांपैकी सर्वजण बिहारच्या गोपालगंज येथे राहणारे आहेत. हरेक सिंह (५२), विकास (२२), गुड्डू (१८), वासुदेव (२२), हरीश साहनी (४२) और वीरेंद्र (२८), अशी मृतांची नावे आहेत. सुशील आणि रामजीत यांच्यासह अन्य दोघे यात जखमी झाले असून त्यांना मेरठ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मध्यप्रदेशमध्ये बस अपघात
मध्य प्रदेशच्या गुना येथे एका अपघातात आठ मजूरांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रात्री दोन वाजता झाली आहे. सर्व मजूर उत्तर प्रदेशात राहणारे आहेत. सर्वजण आपल्या घरी परतत असताना बसला अपघात झाला आहे. यात ५० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.