पुढील आदेशापर्यंत अर्णबला अटक नाही
नवी दिल्ली : टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. पुढील आदेश येईपर्यंत याचिकाकर्त्यास अटक करता येणार नाही, असे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी दोन्ही पक्षांना सांगितले.
तत्पूर्वी वरिष्ठ टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टात ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी अर्णबची बाजू मांडली, तर कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडली. न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली.
अर्णबला दिलेल्या मोकळीकीचा दुरुपयोग करीत असून आपल्या टीव्ही कार्यक्रमतून तो तपास अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारने कोर्टाकडे अपील केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातही सुनावणी होणार आहे.
याआधी एफआयआरदाखल झाल्यावर अर्णबने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अर्णबच्या अटकेस ३ आठवड्यांची स्थगिती देण्यात आली होती. तसेच सगळे एफआयआर एकाच ठिकाणी नोंदवून त्याच ठिकाणाहून तपास केला गेला पाहिजे असा आदेश न्यायालयाने दिला होता.
पालघरमधील साधू हत्येनंतर अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही शोमध्ये यावर ४५ मिनिटांची चर्चा केली. यात त्यांनी सोनिया गांधींविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. यानंतर कॉंग्रेस पक्षाने याविरोधात अर्णब गोस्वामी यांच्यावर अनेक राज्यांत एफआयआर दाखल केले गेले होते.