पुणे : महाराष्ट्रात औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पुर्नरावृत्ती होताहोता टळली आहे. पुण्यातील उरुली कांचन रेल्वे स्थानकानजीक रुळावर चालणाऱ्या मजूरांचा प्राण मोटरमनच्या सतर्कतेने वाचला, एक मोठा अनर्थ टळला आहे. राज्यातील मजूरांचा प्रश्न अजूनही तसाच आहे, बऱ्याच मजूरांची आपल्या घराकडे जाण्याची पायपीट तशीच सुरू आहे. औरंगाबाद येथे रेल्वे रूळावर झोपलेल्या मजूरांच्या अंगावरून रेल्वे गेल्याने तब्बल १६ मजूरांचा मृत्यू झाला होता.
पुण्याच्या उरुली कांचन रेल्वे स्थानकानजीक रुळावर काही मजूर चालत असल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. मोटारमनने दुरूनच हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. मजूरही रेल्वेचा आवाज ऐकल्यानंतर रुळावरून बाजूला झाले. दरम्यान, प्रसंगावधान राखत मोटारमनने आपत्कालीन ब्रेक लावत गाडी थांबवली.
ट्रेनच्या भोंग्याचा आवाज ऐकून मजूरांचा थरकाप उडाला. सर्वजण सुखरुप असल्याचे पाहून मोटरमननेही सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या सर्वांना रेल्वे रुळावरून चालू नका, असा समज देण्यात आला आहे. औरंगाबाद दुर्घटनेनंतर इतर राज्यात पायी जाणाऱ्या मजूरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.