कोरोना नियंत्रणात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे : प्रविण दरेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2020
Total Views |
Darekar_1  H x



 

शीघ्र गतीने काही ठोस उपापययोजनांची आवश्यकता

 
मुंबई : कोरोनो च्या संकटापासून मुक्त होण्याच्या दृष्टीने केवळ भावनिक आवाहन व सहानभूतीची विधाने करुन चालणार नाही तर कोरोनो आटोक्यात आणण्यासाठी शीघ्र गतीने काही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले.


झूम व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनो रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोनोचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र व केरळ मधील रुग्णसंख्या समान होती पण आज महाराष्ट्रामध्ये कोरोना रोखण्याच्या दृष्टीने ठोस व प्रभावशाली नियोजनाच्या अभावामुळे महाराष्ट्र कोरोनो मुळे अधिक धोक्यात आला आहे.


डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी यांना आवश्यक पीपीई व अन्य साहित्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात आला नाही. पोलिसांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे, त्यांना संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अनेक रुग्णालये आजही बंद आहेत. भाजीपाला मंडईमधील गर्दी रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळे मुंबईसह ठिकठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला आहे, अश्या अनेक त्रुटी दरेकर यांनी सरकारच्या निर्दशनास आणून दिल्या.

मुंबई सह मालेगाव, औरंगाबाद आदी भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ते आटोक्यात आणण्यासाठी आपण अन्य राज्यांपेक्षा कमी पडत असल्याचे निदर्शनास आणून देताना दरेकर यांनी सांगितले की, केरळ व महाराष्ट्रात १५ मार्च रोजी कोरोनाचे २४ रुग्ण होते. पण आज ३० एप्रिल अखेर केरळ मध्ये त्यांच्याकडे ४९७ रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात हाच आकडा १० हजार ४९८ इतका झाला आहे, आपण जवळपास १० हजार ने पुढे गेलो आहोत . कोरोना रोखण्यासाठी केरळ सरकारने प्रभावी उपाययोजना केल्या.

अर्थसंकल्पाच्या तुलनेत आरोग्यावर त्यांनी सुमारे ५.५ टक्के इतका खर्च केला आहे तर आपण फक्त ४ टक्के खर्च केले. त्यांच्याकडे मृतांचा आकडा केवळ ४ असून आपल्याकडे ४३२ म़ृत पावले आहेत. ९ मार्च रोजी केरळ ने कोरोनाला रोखण्यासठी २७ मोठ्या रुग्णालयांमध्ये ४० खाटांचे विलिगीकरण कक्ष तातडीने तयार केले व २० हजार कोटीचे पॅकेज १९ मार्चला दिले. अश्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राने घेतली असती तर राज्यात कोरोनोचे वाढते प्रमाण निश्चितच कमी झाले असते, असेही दरेकर यांनी नमूद केले. पण आम्ही सरकारच्या या त्रुटींवर बोट ठेवले तर विरोधक राजकीय भाषा वापरत आहेत अश्या प्रकारचे वातावरण तयार करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या शिफारशींवरुन केंद्रिय निवडणुक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे लोकशाही व घटना श्रेष्ठ असल्याचे दाखवुन दिले. तसेच राजकीय प्रभावात न येता राज्यपाल संविधानाला अनुसरुन निर्णय घेतात हे अधोरेखित झाले असेही त्यांनी सांगितले.
कोरोनोची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केले, पण प्रत्यक्षात मात्र रुग्णालयात जाणा-या रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्ण ७-८ तास येऊन बसतात पण त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत नाही व त्यांच्यावर उपचारही केले जात नाहीत. शेकडोंच्या संख्येने रुग्ण उपचाराअभावी मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी सुरक्षित नाहीत, त्यांच्यामध्ये कोरोनाची बाधा होत आहे. असे असताना मुख्यमंत्री कोरोनोच्या या लढ्यात जास्तीत जास्त नर्स व डॉक्टर्स ने सहभागी होण्याचे आवाहन करित आहेत. असेही त्यांनी सांगितले.

पोलिस हे देव माणूस आहेत असे केवळ बोलून चालणार नाही असे सांगताना ते म्हणाले की, पोलिसांवर सुरक्षेचा ताण असताना त्यांच्यावर हल्ले वाढत आहेत, ते सुरक्षित नाहीत. पोलिसांनाही कोरोना होत आहे. त्यामुळे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. गेले आठ दिवस सोशल मिडियामधून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही विकृत प्रवृत्ती राजकीय पाठबळ घेऊन घाणेरडे कमेन्टस करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा आम्ही धिक्कार करित आहोत. राज्यभर जनताही या विषयी नापंसती व्यक्त करीत आहेत, कारण देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील एक लोकाभिमुख नेते आहेत.

सुसंस्कृत, निश्कलंक व चारित्र्यसंपन्न नेते आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करणे व आपले कोरोनामधील अपयश झाकण्यासाठी अश्या प्रकारचा उपदव्याप काही मंडळी येथे करित आहेत. त्यामुळे यासंदर्भात कायदयाने न्याय मिळाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचे प्रयत्न सुध्दा भाजपच्या माध्यमातून करण्यात येईल असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
झुंबड टाळा अन्यथा कारवाई करावी लागेल या मुख्यंमंत्र्याच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, मुंबईत वांद्रे झालेली गर्दी, महापालिका मंडई मध्ये होत असलेली गर्दी, दोन दिवसांपूर्वी कुर्ल्यामध्ये परराज्यातील जाणा-या मजूरांचे फॉर्म्स वितरित करण्यासाठी काही मंडळीनी काऊंटर्स उघडले होते, त्यासाठी हजारोंची गर्दी जमा झाली होती. भविष्यात असे प्रकारण रोखले पाहिजे, त्यामुळे अश्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे व गर्दी टाळण्यासाठी कडकोट उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

तसेच शेतकरी व कृषीमालाला कोणतेही बंधन नसल्याचे सांगण्यात आले तरीही अनेक शेतीमळे जाळले व तोडले जात आहेत. शेतमाल पडून आहे, सडत आहे, त्याला मार्केटिंग नाही. शेतकरी उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे बंधने हटवून चालणार नाही, त्यांचा शेतीमाल व फळे तसेच कोकणातील आंबा यांची विक्रीची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, अशी सूचनाही दरेकर यांनी यावेळी केली.

@@AUTHORINFO_V1@@