"शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही."
मुंबई :
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना तत्काळ बडतर्फे करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाण्यातील तरुणाला रात्री अपरात्री घरातून उचलून त्याला गुंडांकरवी मारहाण केल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी लक्ष घालत आव्हाडांना तत्काळ मंत्रीपदावरून बडतर्फ करावे, सामान्य जनतेविरोधात अशाप्रकारे वर्तन करणाऱ्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले, "एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही."