मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन ठाण्यातील एका तरूणाला मारहाण झाली असून या प्रकाराचा पक्ष निषेध करत असल्याची भूमीका भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केली. तसेच या प्रकरणाची रितसर चौकशी व्हावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ते म्हणाले, "या प्रकरणातील पीडितातर्फे एफआयआर नोंदवण्यात आली आहे, ती वाचल्यावर काही प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न, तरूणाच्या घरी जे गणवेशधारी पोलिस गेले होते ते त्या तरुणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले?,
दुसरा प्रश्न तरूणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर १० ते १५ इसम पूर्वीच उपस्थित होते. म्हणजे कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानेच धाब्यावर बसवले जात आहेत का?
तिसरा प्रश्न पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्रात गुंडगीरीला शासन-प्रशासन अभय देत आहे का?
प्रश्न चौथा त्या तरुणाने मंत्री महोदयां विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच पण त्याची वाट न बघता गृहनिर्माण मंत्र्यांचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी कायदा हातात घेणे सोयीचे समजले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा महाराष्ट्राच्या गहखात्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का?? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर द्यावीत, असा प्रश्न भंडारी यांनी उपस्थित केला आहे.