नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतून वस्तुस्थिती समोर आली आहे. देशात पूर्णपणे नियंत्रणात असलेला कोरोना, तबलिगी जमातच्या मर्केजनंतर देशभरात वेगाने पसरला, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी सोमवारी मांडली.
मर्केजनंतर विविध राज्यांमध्ये जाऊन लपून बसलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांचा शोध घेण्यासाठी मुस्लिम समुदाय देखील सरकारची मदत करीत आहे. त्यांचे हे सहकार्य कौतुकास्पद असेच आहे, असे डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रपरिषदेत बोलताना स्पष्ट केले.
तबलिगींच्या मर्केजपूर्वी देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. मात्र, मर्केजनंतर यात दुपटीने वाढ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले होते.
देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना आणि घेण्यात आलेल्या निर्णयांची वैद्य यांनी प्रशंसा केली. कोरोनाचे थैमान सुरू असलेल्या इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतीय नेतृत्वाने अतिशय प्रभावीपणे स्थिती हाताळली आहे. काही धाडसी निर्णयांनाही जनतेचे समर्थन प्राप्त होत आहे, असे त्यांनी सांगितले.
देशात कोरोनाचा प्रसार होत असताना, तबलिगी जमातने स्थिती अधिक योग्यप्रकारे हाताळायला हवी होती. त्यांच्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मर्केजच्या आधी आणि त्यानंतरच्या आकडेवारीतून वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यांचा खरा उद्देश लोकांपुढे आला आहे. अनेक मुस्लिम संघटनांनी तबलिगींचा तीव्र विरोध केला आहे. मर्केजनंतर विविध राज्यांमध्ये जाऊन लपून बसलेल्या या जमातच्या लोकांचा शोध घेण्यात मुस्लिम समुदायही सरकारला सहकार्य करीत असून, यासाठी त्यांचे कौतुक करायलाच हवे, असे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.
कोरोना व्हायरसच्या पृष्ठभूमीवर देशात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सुमारे २५.५० लाख नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. याशिवाय, गरीब आणि रोजंदारीवरील मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यासह, तत्काळ मदतीसाठी हेल्पलाईनही सुरू केलेली आहे, असे ते म्हणाले.
रा. स्व. संघाची १५ मार्च रोजीची अ. भा. प्रतिनिधी सभा कोरोनाच्या अनुषंगाने स्थगित करण्याच्या निर्णयामागील कारणाची माहिती देताना ते म्हणाले की, तबलिगी जमातनेही आपला मर्केजचा कार्यक्रम स्थगित करायला हवा होता. बंगळुरू येथील प्रतिनिधी सभेत १५०० प्रतिनिधी सहभागी होणार होते. त्या सर्वांना रेल्वे गाड्या आणि विमानांचे तिकीट रद्द करण्यास सांगण्यात आले, तसेच जे प्रतिनिधी आधीच बंगळुरूत दाखल झाले होते, त्यांनाही तातडीने परत पाठविण्यात आले. याशिवाय, स्वयंसेवकांसाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा संघ शिक्षा वर्ग आणि जूनपर्यंत होणारे इतर कार्यक्रमही रद्द करण्यात येत असल्याची घोषणा डॉ. मनमोहन वैद्य यांनी यावेळी केली.
कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या अर्थव्यवस्थेवर होणार्या परिणामाविषयी विचारले असता, डॉ. वैद्य म्हणाले की, कोरोनाला आळा घालणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यास प्रथम प्राधान्य दिले जावे. हे सर्व करताना, अर्थव्यवस्थेवर कमीतकमी परिणाम होईल, याची काळजी सरकार नक्कीच घेईल, अशी आशा आहे.