कोरोना संकटावर धैर्याने मात करूया : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020
Total Views |
Sharad-Pawar_1  



मुंबई
: लातूर भूकंप असेल किंवा मुंबई बॉम्बस्फोट असेल या पूर्व इतिहासाचे स्मरण करून आता आलेल्या संकटावर धैर्याने मात करून कामाला लागूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेला केले आहे. दरम्यान पोलीस आणि डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत शरद पवार यांना दु:ख झाले असून आपल्यासाठी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या लोकांना सहकार्य करूया, असे आवाहनही पवार यांनी केले.
 

 
 
शरद पवार यांनी गुरुवारी पुन्हा जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मुंबई व पुणे याबाबतीत वेगळा निर्णय होईल परंतु काही ठिकाणांचा लॉकडाऊन उठवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर्वीसारखी गर्दी करु नका. सरकारच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
 
 

 
कारखाने, व्यापार आणि उद्योग गेले ४० दिवस बंद आहेत. रोजगार बुडाला आहे. त्याचा विपरीत परिणाम शासनाच्या अर्थकारणावर होत आहे. राज्याचा २०-२१ चा अर्थसंकल्प पाहिला तर महसुली उत्पन्न ३ लाख ४७ हजार कोटीच्या आसपास जाईल असे दिसत आहे, परंतु आज सुधारित माहिती घेतली असता या महसुलात तूट पडेल असे चित्र आहे. ती तूट १ लाख ४० हजार कोटी होईल. याचा अर्थ एकंदर येणाऱ्या उत्पन्नापैकी ४० टक्के उत्पन्न महसुलाचे कमी होईल याचा एकंदरीत परिणाम राज्याच्या सगळ्या विकासाच्या विविध कामावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून राज्यावरील आर्थिक संकट लक्षात घेऊन पंतप्रधानांना या प्रश्नांची कल्पना यावी म्हणून सविस्तर प्रस्ताव दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
 
 

 
दरम्यान केंद्र व राज्य एकत्र बसून या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची निती ठरवावी. त्यासाठी त्रास होईल पण आव्हान आहे. त्यामुळे एकजुटीने यावर मात करु असे सांगतानाच राज्यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करता येईल म्हणून हा प्रस्ताव दिल्याचे सांगतानाच केंद्र सरकारने राज्यांना अधिक शक्ती दिली पाहिजे. सध्या राज्य फिल्डवर काम करत आहे. लोकांच्या यातना कमी करण्यासाठी कामावर गुंतले आहे. सगळी यंत्रणा कामाला लागली आहे तर केंद्राची यंत्रणा ही रिसोर्स कसे निर्माण करता येईल. जगात कसे बदल होत आहेत. संशोधन करून आपल्याकडे कशी उपयुक्तता करता येईल असे काम करत आहे त्यामुळे त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.
 

 
वेगवेगळ्या राज्यात देवदर्शन व पर्यटनासाठी गेलेले नागरीक अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुंबईत आपत्ती व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. तिथे अभय यावलकर काम करत आहेत. अजूनही कुणाला काही अडचण असेल त्यांनी ०२२-२२०२७९९०,०२२-२२०२३०३९,याशिवाय ९८२११०७५६५, ८००७९०२१४५ इथे संपर्क साधावा. त्यांच्याकडून सहकार्य मिळेल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
 
 

कोरोना संकटाचा परिणाम शेतीवर होत आहे. शेतकर्‍यांना शेतीसाठीचे जे कर्ज दिले जाते त्याची पुनर्रचना केली पाहिजे. अल्पमुदतीचे कर्ज मध्य व दिर्घ मुदतीचे करावे. कर्जफेडीचे हप्ते लांबवले पाहिजे. व्याजदरात सवलत दिली पाहिजे. पीककर्जाचा व्याजाचा दर शून्यावर आणावा आणि तसा दर परत करण्याचा कालावधी ३० जून २०२० च्यापुढे ढकलावा. असेच निर्णय उद्योग, व्यापारासंबंधी आर्थिक क्षेत्रात घेण्याची गरज आहे , तरच ख-याअर्थाने संकटग्रस्त लोकांना मदत होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.
 

 
 
जगात कोरोनाचे संकट मोठं आहे. दिवसेंदिवस जगातील आकडेवारी पाहिली तर पाश्चिमात्य देशात मृत्यूची संख्या वाढली आहे. शिवाय भारतातही प्रादुर्भाव वाढला आहे. देशात ३३ हजार रुग्ण आहेत. तर १ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ हजार ३२५ उपचार घेवून घरी गेले आहेत. हे देशाचे चित्र आहे. तर महाराष्ट्रात ९ हजार ९१५ रुग्ण आहेत. ४३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ५९३ उपचार घेवून घरी गेले आहेत. भारताचा विचार करता अधिक संख्या ही मुंबई व पुणे, जळगाव, नाशिकचे मालेगाव,औरंगाबाद, पूणे जिल्हा आहे. मुंबई व पुणे येथे सर्वाधिक संख्या लक्षात येत आहे. मुंबईतील झोपडपट्टीचा विचार केला तर संख्या अधिक आहे. यामध्ये महानगरपालिकांनी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच रुग्ण कोरोनाचे नाहीत. अन्य रोगाचे आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा अतिशय कष्टाने या क्षेत्रातील सर्व घटक मनापासून काम करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी आपण घेतोय. वैद्यकीय क्षेत्रातील लोक कष्ट व धोका पत्करुन काम करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठेवणारे पोलिसही काम करत आहेत. यामुळे इथली परिस्थिती दुरुस्त होण्यास मदत होत आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक शरद पवार यांनी केले.
 

 
 
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 
उद्या महाराष्ट्रदिन. कामगार दिवस. कामगार, कष्टकऱ्यांचे स्मरण करणारा हा दिवस आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे असेही शरद पवार म्हणाले. याशिवाय १ मे १९६० रोजी अनेक वर्षे महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचे राज्य व्हावे ही पूर्तता झालेला हा दिवस. आज ६० वर्षे महाराष्ट्र निर्मितीला पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे आपल्या सोप्या व साध्या भाषेतील खंजिरीने समन्वयाचा, मानवतेचा संदेश दिला ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे. त्यांची जयंती अनेक भागात साजरी होत आहे.
 
 

 
इरफान खान, ऋषी कपूर याना श्रद्धांजली
 
 
आज दोन महान कलावंत आपल्यात नाहीत. इरफान खान यांनी कलेच्या क्षेत्रात योगदान दिले. कलेच्या माध्यमातून संबोधित केले. तर कपूर कुटुंब व देशातील प्रत्येक रसिक यांच्या काही पिढ्या यांचे नाते आहे. त्यामध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर या सर्वांची कला देशाबाहेर पोचली त्याबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. आज याच मालिकेतील कलावंत ऋषी कपूर यांचे निधन झाले. रसिकांना संतुष्ट ठेवणाऱ्या या महान कलाकारांना शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.





@@AUTHORINFO_V1@@