मुंबई : साताऱ्यात असलेल्या वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ २३ तारखेला संपल्यानंतर आज दि २६ रोजी धीरज आणि कपिल वाधवान या बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीबीआयने सातारा पोलिसांकडून यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत दिली आहे. तसेच त्यांच्या अटकेची कारवाई सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमिताभ गुप्तांचा चौकशी अहवाल आज किंवा उद्या येणार
बँक घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला गेले होते. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र गृहमंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचे पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. अमिताभ गुप्ता यांचा चौकशी अहवाल आज किंवा उद्या येणार असल्याचे देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनोज सौनिक या प्रकरणी चौकशी करत आहेत. त्यांचा अहवाल आज किंवा उद्या मिळणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही वाधवान कुटुंबातील २३जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघड झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी विरोध केला असता ही बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृहमंत्रालयाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र मिळाले. यानंतर वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.