‘आर्य’ शब्दाचे मुळातले विविध अर्थ मागच्या लेखात आपण पाहिले. पुढच्या विषयाकडे वळण्याआधी याच्या सोबतच युरोपीय संशोधकांनी ‘वंशवाचक’ ठरवून टाकलेले असेच अजून दोन शब्दही पाहूया. ते आहेत ‘दस्यु’ आणि ‘दास.’
‘आर्य’ शब्दाचे मुळातले विविध अर्थ मागच्या लेखात आपण पाहिले. पुढच्या विषयाकडे वळण्याआधी याच्या सोबतच युरोपीय संशोधकांनी ‘वंशवाचक’ ठरवून टाकलेले असेच अजून दोन शब्दही पाहूया. ते आहेत ‘दस्यु’ आणि ‘दास’. मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या संस्कृत कोशवाङ्मयात या शब्दांचेही अर्थ आपण असेच पाहू शकतो. ‘दस्यु’ शब्दाचे (१) धाडसी डाकू / चोर, (२) खल / दुष्ट, (३) राक्षसी वृत्तीचा, (४) शत्रू, इत्यादि अर्थ करण्यात आलेले आहेत. यावरून स्पष्टपणे लक्षात येते, की हे अर्थ सुद्धा गुणवाचक किंवा कर्मवाचकच आहेत, यांपैकी कोणताही अर्थ वंशवाचक नाही. तीच गोष्ट ‘दास’ शब्दाची. याचेही अर्थ (१) नोकर, (२) सेवक, (३) शूद्र, (४) निरोप्या / दूत, इत्यादि दिलेले आहेत. ते ही गुणवाचक किंवा कर्मवाचकच आहेत, वंशवाचक नाहीत. आर्य आणि दस्यु या शब्दप्रयोगांचे वैदिक साहित्यातले काही दाखले आता पाहूया.
वैदिक संदर्भ :
संस्कृत साहित्यात सर्वाधिक प्राचीन मानला गेलेला ग्रंथ म्हणजे ‘ऋग्वेद’. यामध्ये ‘आर्य’, ‘दस्यु’ हे शब्द तुरळक कुठे कुठे आढळतात. त्यांपैकी आत्तापुरते इथे उदाहरणार्थ म्हणून एक-दोन संदर्भ पाहू:
वि जानीह्यार्यान्ये च दस्यवो बर्हिष्मते रन्धया शासदव्रतान् ।
शाकी भव यजमानस्य चोदिता विश्वेत्ता ते सधमादेषु चाकन ॥
ऋग्वेद १.५१.८॥
अर्थ :
ऋग्वेदाचे दुसरे एक भाष्यकार स्वामी दयानंद सरस्वती (इ. सनाचे १९वे शतक) याच मंत्राच्या भाष्यात म्हणतात, “आर्यान् धार्मिकानाप्तान् विदुषः सर्वोपकारकान् मनुष्यान् ...... दस्यवः परपीडका मूर्खा धर्मरहिता दुष्टा मनुष्याः” अर्थात “आर्य म्हणजे धार्मिक प्रवृत्तीचे, विद्वान, सर्वांना उपकारक अशा व्यक्ती” आणि “दस्यू म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणारे, मूर्ख, अधार्मिक, दुष्ट अशा व्यक्ती”. इथे सुद्धा हे दोन्ही शब्द आपल्याला कोणत्या अंगाने ‘वंशवाचक’ वाटतात?
ऋग्वेदातील अजून एका ठिकाणी
अज्रा इन्द्रस्य गिरयश्चिदृष्वा गम्भीरे चिद्भवति गाधमस्मै ॥
ऋग्वेद ६.२४.८॥
या मंत्रात पहिल्या ओळीत ‘दस्युजूताय’ असा शब्दप्रयोग आलेला आहे. त्यावर भाष्य करताना सायणाचार्य ‘दस्यु’ शब्दाचा ‘कर्मवर्जित’ म्हणजे ‘कामधंदे सोडून दिलेला – रिकामटेकडा’ असाही अर्थ सांगतात! “अशा रिकामटेकड्यांनी भरीस घातलेल्या (दस्युजूत) यजमानाने कितीही स्तुती केली, तरी इंद्रदेव त्याला बधत नाही”, असा अर्थ सायणाचार्य इथे सांगतात!!
सायणाचार्य असोत की दयानंद सरस्वती असोत, या दोन्ही भाष्यकारांनी ‘आर्य’ म्हणजे ‘इ. स. पूर्व १८०० मध्ये मध्य-आशियातून भारतात स्थलांतर करून आलेले आक्रमक उपरे लोक’ आणि ‘दस्यू’ म्हणजे ‘आर्यांच्या आक्रमणापूर्वी भारतात राहत असलेले मूलनिवासी लोक’ असा अर्थ सांगितलेला नाही. १९व्या शतकापर्यंत हजारो वर्षे ज्या शब्दांचे अर्थ इथे ‘गुणवाचक’ होते, ते १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून अचानकच ‘वंशवाचक’ आणि ‘जमातवाचक’ कसे काय बनले?
भरकटलेले तर्क :
ये शुभ्रा घोरवर्पसः सुक्षत्रासो रिशादसः ।
मरुद्भिरग्न आ गहि ॥
ऋग्वेद १.१९.५॥
‘मेधातिथि काण्व’ ऋषींनी अग्निदेवतेचे आवाहन करताना अग्नी आणि मरुत् यांना उद्देशून केलेली स्तुतिपर प्रार्थना यामध्ये आहे. या मंत्राचा अर्थ आहे, “जे शुभ्र वर्णाचे (गोरे), उग्र देहाचे (उंच / धिप्पाड), उत्तम क्षत्रिय आणि शत्रूंना खाणारे - मारणारे (युद्धशास्त्रात प्रवीण / आक्रमक वृत्तीचे) आहेत, अशा मरुतांबरोबर हे अग्ने, तू इथे ये”. यातली मरुत् देवता ही ‘आर्य देवता’ असल्यामुळे तशाच वर्णनाचे ‘आर्य’ लोक सुद्धा असणार, असे या संशोधकांनी गृहीत धरून टाकले! विविध देवतांच्या रूपांची वर्णने असलेले असे अनेक मंत्र ऋग्वेदात अजूनही आहेत. अशा पद्धतीने युरोपीय विद्वानांनी असंख्य वेदमंत्रांवरून केलेली गृहीतके ठिकठिकाणी भरकटलेली दिसतात. त्यामुळे यावर आधारित संशोधने जरी भारतीय अभ्यासकांनी केली, तरी ती सुद्धा तितकीच भरकटलेली असणार, हे ओघानेच आले!
तर वाचकहो, अशा पद्धतीने या पाश्चात्त्य विद्वानांचे आर्य, दस्यु वगैरे शब्दांचे अर्थ त्यांच्या सोयीनुसार हवे तिकडे वळवण्याचे प्रयत्न पाहून असे वाटते, की हे लोक ‘वडाची साल पिंपळाला’ लावून त्यालाच ‘वटवृक्ष’ म्हणून सिद्ध करण्यामागे लागलेले आहेत, या असल्या बिनबुडाच्या तर्कांचेच ‘सिद्धांत’ बनवून जगात खपवत आहेत. सगळ्याच मनगढंत कहाण्या आणि सगळी फक्त मनोराज्येच!
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)