मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामींवर बुधवारी रात्री झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भाजप महाराष्ट्रतर्फेही यावर प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे. 'पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ल्याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत. या हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर मांडणाऱ्या पत्रकार आणि सोशल मिडीयावर लोकांची मुस्काटदाबी करायचा प्रयत्न गेले काही दिवस राज्यात सुरू आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे, अशा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
पालघरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत होता. या संदर्भात अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टिव्हीवरील चर्चेत सोनिया गांधी यावर गप्प का ?, असा जाब विचारला. त्यांचे सरकार असलेल्या राज्यात अशाप्रकारे साधूंची निर्घृण हत्या केली जाते, अशीच हत्या जर इतर कुठल्या धर्मातील लोकांची झाली असती तर त्या गप्प बसल्या असत्या का ?, असा सवाल त्यांनी आपल्या कार्यक्रमात विचारला होता. दरम्यान, या प्रकरणी अर्णब यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल आता सर्व स्तरातून प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.