'इस्लामोफोबिया'वरून टीका करणाऱ्यांचा समाचार
नवी दिल्ली : भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग आहे. इथे सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक हक्क सुरक्षित आहेत, असे मत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी व्यक्त केले आहे. 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन'ने (ओआयसी) देशामधील मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त करताना भारत इस्लामविरोधी असल्याचे मत व्यक्त केले होते. याला प्रत्युत्तर देत त्यांनी 'इस्लामोफोबिया'वरून टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.
"भारतीय मुस्लीमांचा विकास होत आहे, अशातच काही प्रवृत्ती देशातील सामाजिक ऐक्याचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे लोक हे मुस्लीमांचे मित्र असूच शकत नाहीत, असा घणाघात नकवी यांनी ओआयसीवर लगावला आहे. 'भारतातील सर्व नागरिकांना संविधानिक, सामाजिक आणि धार्मिक हक्क भारतीय संविधानानेच दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'ओआयसी'ने रविवारी एका पत्रकाद्वारे भारताने मुस्लीमांच्या हक्कांसाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली. देशात घडणाऱ्या इस्लामविरोधी घटना थांबवाव्यात असेही त्यांनी म्हटले. भारतीय प्रसारमाध्यमेही मुस्लिमांबद्दल नकारात्मक वृत्तांकन करत असल्याचे त्यात म्हटले होते. नकवी यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रीया दिली.
'मोदी सरकारच्या नेतृत्वात आम्ही योग्य पद्धतीने काम करत आहोत, पंतपधान नरेंद्र मोदी जेव्हा जनतेला साद घालतात, त्यांचा विचार करतात तेव्हा ते १३० कोटी देशवासीयांचा विचार करतात. मात्र, टीकाकारांना या गोष्टी दिसत नाहीत. ती त्यांची अडचण आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले. पूर्वग्रह दूषित ठेवून धार्माच्या चष्म्यातून टीका करणारे गट देशात अजूनही कार्यरत आहेत, चुकीची माहिती पसरवत आहेत. खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे, अशा दुष्प्रवृत्तीपासून दूर व्हायला हवे, असा सावध इशारा त्यांनी देशवासीयांना दिला. 'भारतात धर्मनिरपेक्षता व सौहार्द ही ‘पॉलिटकल फॅशन’ नसून ‘परफेक्ट पॅशन’ आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
नकवी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना रमजानच्या पवित्र महिन्यात घरीच राहून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, "सर्व मुस्लीम धर्मगुरु, धार्मिक व सामाजिक संघटना यांनी भारतीय मुस्लीम बांधवांच्या संयुक्त रुपात सुरू होणाऱ्या २४ एप्रिलच्या पवित्र रमजान महिना घरी राहूनच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे" या काळात सर्व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.