संबंधित पक्षांनी उत्तरे द्यावीत भाजपचा सवाल
नवी दिल्ली : पालघरमध्ये जमावाच्या मारहाणीत साधूंची हत्या झाली त्यावेळी घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीएमचे नेते, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी विचारला आहे. दरम्यान, भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाब विचारला आहे.
पालघरमध्ये चारशे ते पाचशे जणांकडून दोन साधूंची अमानुष हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद आता देशभरात उमटत आहेत. मात्र, हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य काशीनाथ चौधरी, सीपीएम पक्षाचे विष्णु पातरा, सुभाष भावर आणि धर्मा भावर उपस्थित होते, असे सुनील देवधर यांनी म्हटले आहे.
संबित पात्रा यांनी ट्विट करत प्रश्न विचारला कि, व्हीडिओमध्ये दिसणारी ही माणसे कोण आहेत, जरा कुणी सांगू शकेल का ?, यावर सुनील देवधर यांनी रिट्विट करत संबंधितांची माहिती काढली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीत दोन्ही पक्षाच्या या नेत्यांची नावे उघड झाली आहेत. दरम्यान, त्यांच्यावर कारवाई झाली आहे का याबद्दल सविस्तर वृत्त समजू शकले नाही. यापूर्वीच सुनील देवधर यांनी हा हल्ला वनवासींनी केला नसल्याचे म्हटले होते. मार्क्सवादी पक्षाच्या गुंडांचे हे कारस्थान आहे, असाही दावा केला होता.