नवी दिल्ली : दिल्लीत एका डॉक्टराने आत्महत्या केली असून त्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जारवाल यांच्याविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. नेब सराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे कि, आमदार जारवाल यांना कंटाळून मी हे पाऊल उचलले आहे.
शवविच्छेदनानंतर पोलीसांनी कुटूंबियांकडे मृतदेह सोपवला आहे. आमदार जारवाल आणि त्यांचे सहकारी कपिल नागर या दोघांविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मृत डॉक्टरांच्या मुलाने तक्रार दाखल केली आहे. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी लिहीलेले पत्र तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय डॉ. राजेंद्र कुमार देवली हे दुर्गा विहार येथे क्लिनिक चालवत होते. शेजारीच त्यांचे घर आहे. शनिवार, दि. १८ एप्रिल २०२० रोजी सकाळी त्यांचा घरमालक छतावर गेले त्यावेळी डॉक्टरांचा मृतदेह त्यांच्या खोलीत लटकत असलेला त्यांना दिसला. त्यांनी तत्काळ घरातील इतर कुटूंबियांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहाजवळ एक चिठ्ठी लिहीलेली आढळली, आप पक्षाचे आमदार जारवाल आणि त्यांचा सहकारी कपिल नागर यांच्याविरोधात आरोप लावण्यात आले आहेत. जारवाल यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यापूर्वी राजद पक्षाच्या एका महिलेचे शोषण केल्याचाही आरोप आहे. इंडिया अगेंस्ट करप्शन या मोहिमेपासून केजरीवाल यांच्यासोबत त्याचे संबंध आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
आमदार जारवाल यांच्यावर आरोप आहे कि, गेल्या पाच वर्षांत डॉक्टरांकडून आमदारांनी पाच लाख रुपये उकळले आहेत. आपल्या कुटूंबियांचा छळ होऊ नये यासाठी हे पैसे दिल्याचा हा आरोप आहे. मात्र, तरीही वारंवार आमदार आणि त्यांच्या साथीदारांकडून पैशांची मागणी होत असते. 'माझी शेवटची इच्छा हीच आहे कि, आमदार जारवालला आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा व्हायला हवी', असे मृत्यूपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत डॉक्टरांनी म्हटले आहे.
मला माध्यमांद्वारे या आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीची माहिती मिळाली आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे. गेले ८ ते १० महिने मी त्यांना भेटलोही नाही. त्यांच्याशी बोलणेही झालेले नाही. २०१७ रोजी टँकर माफीयांविरोधात स्टींग ऑपरेशन झाले होते. त्यावेळी त्यांच्या सर्वगाड्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मला यापूर्वीही फसवण्याचा प्रयत्न झाला आहे. होणाऱ्या चौकशीला समोरे जाण्यासाठी मी तयार आहे.
दरम्यान, कुटूंबियांनी केलेल्या आरोपानुसार गावातील जमीन विकून कपिल नागरला मोठी रक्कम देण्यात आली होती. तरीही त्यांना धमक्या येत होत्या. त्यांचे पाच टँकर दिल्लीतील जलबोर्डवर होते. तिथून येणारी मिळकतही थांबवण्यात आली होती. डॉक्टरांच्या मुलाने एक ऑडियो क्लिपमध्ये आपल्या वडिलांना आमदार धमकी देत असल्याचा दावाही केला आहे.