मुंबई : वांद्रे स्थानकानजीक इतके लोक एकत्र आले तरी सरकारला कळलं कसं नाही?, असा प्रश्न भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. याला जबाबदार कोण, असा प्रश्न शेलार यांनी सरकारला विचारला आहे.
सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवत लॉकडाऊनच्या काळात वांद्रे स्थानकात आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या संख्येने मजूरांची गर्दी जमली होती. सायंकाळी चार वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने नागरिक जमले असल्याने प्रचंड गोंधळ उडाला. वांद्रे स्थानक हे बाहेरील राज्यांमध्ये जाण्यासाठी महत्वाचे स्थानक मानले जाते. लॉकडाऊनच्या काळात अशाप्रकारे मजूरांचा मोठ्या संख्येने जमण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सूरतमध्ये रस्त्यांवर मजूर मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते.
अशाप्रकारे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र रस्त्यावर आल्याने मुंबईला असलेला कोरोनाचा विळखा हा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही आता व्यक्त केली जात आहे. वांद्रे स्थानकात इतक्या मोठ्या संख्येने जमा झालेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. वांद्रे स्थानकातील गर्दी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान काहीशी ओसरली आणि अखेर परिस्थिती नियंत्रणात आली.