कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईतील १४६ परिसर सील!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |

mumbai _1  H x


बृहन्मुंबई महापालिकेकडून खबरदारीचा उपाय


मुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने मुंबई आणि उपनगर परिसरातील एकूण १४६ परिसर पूर्णपणे सील केले आहेत. या सील केल्या गेलेल्या ‘no-go zones’मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीची पावले उचलत हे परिसर सील करण्यात आले आहेत. हे परिसर सील करताना इथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरुच राहिल याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.


दक्षिण मुंबईतील ४८ परिसर सील करण्यात आले आहेत, यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. वरळीत सोमवारी कोरोना विषाणूचे ८ रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर सील करण्यात आला आहे. मंगळवारी वरळी कोळीवाडा परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही १० वर पोहोचली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीच हा परिसर सील करण्यात आला होता. हा मुंबईतील दाट लोकवस्तीचा परिसर आहे. जवळपास ८० हजार लोक इथे राहतात. इथल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणे शक्य नाही असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात आरोग्य जनजागृती मोहीम राबवली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इथे २४ तास वैद्यकीय सेवा सुरु ठेवली आहे तसेच बाहेर रुग्णवाहिका देखील उभी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या दाट लोकवस्तीच्या भागात दररोज प्रत्येकाला अन्नधान्य आणि दूध पुरवणे ही खरी कसरत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


तर प्रभादेवीमधील एका चाळीत कोरोनाचा संसर्ग झालेले १३ रुग्ण आढळल्यानंतर हा परिसरदेखील सील करण्यात आला आहे. या परिसरात खानावळ चालवणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. २४ मार्चला तिच्या कोरोना विषाणूच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या होत्या तीन दिवसांनी तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पश्चिम उपनगरीय भागात ४६ परिसर हे सील करण्यात आले आहेत. त्यात वांद्रे पश्चिम आणि खार परिसराचा समावेश वरच्या स्थानी आहे. हिल रोड, एसव्ही रोड, २१ रोड, गर्व्हमेंट कॉलनी, बिंबिसार नगर हे परिसर सील करण्यात आले आहेत. तर पूर्व उपनगरीय भागातील ४८ परिसर हे सील करण्यात आले आहेत, यात चेंबूर आणि घाटकोपरमधल्या भागांचा अधिक समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@