नवी दिल्ली : गुरुवारी काही काँग्रेस खासदारांनी लोकसभेमध्ये खूप मोठा गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सात काँग्रेस खासदारांचे निलंबन केले होते. पुढे या सर्व गदारोळानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या पुढच्या कामकाजात भाग घेतला नाही. तर शुक्रवारीदेखील सलग दुसऱ्यादिवशी ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजाला गैरहजेरी दर्शवली. काँग्रेस खासदारांच्या केलेल्या गैरवर्तनामुळे शांत राहून त्यांनी या घटनेचा निषेध दर्शविला.
काय आहे प्रकरण?
दिल्लीमधील हिंसाचारावरून विरोधी पक्ष संसदेत सतत कुरघोडी करीत आहे. सभागृहात त्वरित चर्चेची मागणी करण्यावर ते ठाम आहेत. सोमवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहात गदारोळ झाल्यानंतर मंगळवारी १७ पक्षांशी बैठक घेतली. यानंतरही मंगळवारी लोकसभेत गदारोळ झाला आणि महिला खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली. ओम बिर्ला यांनी यांनी विरोधी पक्षांना सांगितले होते की सरकार दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्यास तयार आहे, सरकार होळीनंतर लोकसभेत चर्चेसाठी तयार आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्ष खासदार संतप्त झाले आणि त्यांनी पाने फाडून सभापतींच्या दिशेने फेकली.
यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर सात खासदारांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी कॉंग्रेसचे सात खासदार गौरव गोगोई, टीएन प्रतापन, डीन कुरियनोस, गुरजित औजला, आर उन्निथन, माणिक टागोर, बेनी बहानन यांना निलंबित करण्यात आले.