नवी दिल्ली : सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशामध्ये बऱ्याच देशांमध्ये कोरोना विषाणूंमुळे अनेकजणांना जीव गमवावे लागले आहे. तसेच, भारतासह अनेक देशांनी याबद्दल खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. अशामध्ये इटलीहून भारतात परतलेले काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी दिल्ली येथे हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी भाजपचे खासदार रमेश बिधुरीयांनी राहुल गांधींना 'इटलीवरुन परतल्यानंतर आपण कोरोनाची चाचणी केली आहे का?' असा प्रश्न विचारलेला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये इटलीचाही समावेश आहे. इटलीमध्ये कोरोनाची लागण झाल्याने आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राहुल गांधींनी दिल्लीला भेट देण्याआधी भारतात परतल्यानंतर सर्वात आधी आपली तपासणी करुन घ्यायला हवी होती असा टोमणा मारला आहे. संसद परिसरामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश बिधुरी यांनी सांगितले की, “राहुल गांधी नुकतेच इटलीवरुन परतले आहेत. विमानतळावर त्यांची तपासणी झाली की नाही मला माहित नाही. करोना व्हायरस संसर्गजन्य रोग आहे. लोकांमध्ये जाण्याआधी त्यांनी आपण करोना व्हायरसची चाचणी केली की नाही हे सांगायला हवे. लोकांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे”.