राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २२५वर!
मुंबई : दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई, पुणे आणि बुलढाणा या भागात नवीन ५ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २२५ वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. रुग्ण संख्येत सातत्याने होणारी वाढ चिंताजनक आहे. मात्र यातून अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होत असल्याचे दिलासादायक चित्रही पाहायला मिळत आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकार आरोग्य सेवांसह स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देत आहे.
मुंबई मधील वरळी कोळीवाड्यातही कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे वरळी कोळीवाडा पोलिसांनी सील केला असून त्या परिसराचे निर्जुंतीकरण करण्यात आले आहे. तसंच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आदेशही देण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह भारत देशातही थैमान घातले आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२०० च्या पार गेला असून यात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसंच अनेक नामवंत संस्था, व्यक्ती, सेलिब्रेटी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री साहाय्यता निधीत दान देऊन मोलाचे योगदान करत आहेत. दरम्यान केवळ लॉकडाऊनच्या नियमांचे आपल्याकडून उल्लंघन होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यायला घेणे गरजेचे आहे.