प्रीपेड प्लानची वॅलिडीटी वाढणार !
नवी दिल्ली : लॉकडाऊन काळात मोबाईल युझर्सना रिचार्ज करण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) टेलिकॉम कंपन्यांना सध्या सुरू असलेल्या डाटा प्लानची वैधता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आदी मोबाईल कंपन्यांना पत्र लिहीत ग्राहकांच्या सध्याच्या सुरू असलेल्या प्लान्सची वैधता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
दूरसंचार सेवा ही अत्यावश्यक सेवा ठरवत लॉकडाऊनच्या काळात अबाधित राहावी यासाठी प्रयत्न केले. लॉकडाऊनच्या काळात सेवा खंडीत झाल्यास कंपन्या कोणती पावले उचणार आहेत या संदर्भातील विचारणा केली आहे. सध्यातरी कंपन्यांतर्फे या पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र, लवकरच या प्रकरणी निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्राहक सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक ग्राहक अजूनही रिटेल दुकानांद्वारेच मोबाईल रिचार्ज करत आहेत. ऑनलाइन रिचार्ज करणे सर्वांनाच शक्य नाही. ग्राहकांमध्ये लॉकडाऊनमुळे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत.