भारताच्या इतिहासलेखनात भारताचा आत्मा दिसला पाहिजे : डॉ. बालमुकुंद पांडेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2020
Total Views |
Balmukundji_1  

मुंबई : “भारताच्या गेल्या हजार बाराशे वर्षांमध्ये लिहिल्या गेलेल्या इतिहासात भारताचा आत्मा कुठेच दिसत नाही. याचे कारण म्हणजे या काळात जो इतिहास लिहिला गेला तो आधी मुघलांची राजवट आणि नंतर पोर्तुगीज व ब्रिटिशांची राजवट बळकट करण्याच्या हेतूने लिहिला गेला. त्या इतिहासात भारत व भारतीय समाजातील दोष, उणिवा आणि कालबाह्य रूढी व परंपरा यांच्यावरच भर दिला गेला. भारतीयांच्या पराभवांचाच इतिहास लिहिला गेला. परंतु, त्यांचे शौर्य, पराक्रम, त्याग, विविध ज्ञानशाखांतील विद्वत्ता अशा गुणांकडे योजनापूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. याचा परिणाम म्हणून या काळात शिकून सवरून मोठ्या झालेल्या बहुतेकांच्या मनात (काही अपवाद वगळता) आपला भारत देश, समाज, संस्कृती, इतिहास यांच्याबद्दल प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला व त्याचबरोबर परकीय राजवटींबाबत श्रेष्ठतेची भावना देशभरात निर्माण झाली,” असे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय संघटन सचिव ङॉ. बालमुकुंद पांडेय यांनी केले. ते इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरिवली भाग) यांच्यावतीने बोरिवलीतील सोडावाला शाळेमध्ये आयोजित केलेल्या ‘वर्तमान संदर्भात भारताचा इतिहास’ या विशेष व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या व्याख्यानाला दहिसर, बोरिवली भागातील दोनशेच्यावर नागरिक उपस्थित होते.


त्या आधी अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गिरीशभाई ठाकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना “आपल्या राष्ट्राचा मूळ इतिहास समजून घ्यायचा असेल तर वेद, उपनिषदे, पुराणे व रामायण-महाभारतातील महापुरुषांच्या जीवनांचा, संतांचा, समाज सुधारकांचा व वैज्ञानिकांचा अभ्यास केला पाहिजे,” अशी भूमिका मांडली. या प्रसंगी विशेष निमंत्रित असलेले जैनमुनी प्रशमरत्न विजयजी महाराज आपल्या उद्बोधनात म्हणाले की, “आपला धर्म, संस्कृती व इतिहास यांची नीट जाणीव करून देण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था आपल्या मातृभाषेतून शिक्षण व संस्कार देणारी असली पाहिजे.” याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोरेगाव विभागाचे संघचालक डॉ. विष्णू वझे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध इतिहास व पुरातत्त्वज्ञ डॉक्टर सुरज पंडित यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@